वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 01:40 IST2019-05-09T01:40:44+5:302019-05-09T01:40:57+5:30

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे.

'Fever' of increasing temperature, heat and troubles to humans and pet animals | वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास

वाढत्या तापमानाचा ‘ताप’, मनुष्य आणि पाळीव जनावरांना उन्हाचा त्रास

- सिकंदर अनवारे
दासगाव : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यातील पारा वाढत असून वातावरणातील बदलत्या तापमानाचा मानवी जीवनाबरोबर पाळीव जनावरांवर देखील परिणाम होत आहे. पाळीव तसेच मोकाट जनावरांना उष्माघात आणि कोल्ड स्ट्रोकची बाधा होत आहे, तर भर उन्हात फिरणाऱ्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पाळीव जनावरांमध्ये बकºया, कोंबड्या यांना देखील उन्हाचा फटका बसत आहे. कोंबड्यांमध्ये देवी आणि रानीखेत हा आजार उद्भवतो. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वाढत्या तापमानात जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन महाड पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जगभरात जाणवू लागली आहे. यामुळे विविध ठिकाणचे तापमान प्रतिवर्षी वाढतच आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा कमालीचा वाढला आहे. गेल्या काही दिवसात हा परिणाम कोकणात देखील जाणवू लागला आहे. महाड आणि परिसरात हे तापमान ३५ ते ४० अंशापर्यंत गेले आहे. वाढत्या उष्म्याचा फटका जसा मानवी जीवनाला बसत आहे तसाच ग्रामीण भागातील पाळीव जनावरांना देखील बसत आहे. कोकणात ग्रामीण भागात ऐन उन्हाळ्यात जनावरे उघड्यावर मोकाट सोडून दिली जातात. तीव्र उन्हात ही जनावरे मिळेल ते पाणी पितात. यामुळे जनावरांच्या पोटात विषबाधा होते. काही जनावरे उन्हात भटकल्यानंतर वेगाने पाणी पितात यामुळे कोल्ड स्ट्रोक येतो आणि जनावर दगावले जाते. उन्हाळ्यात लागत असलेल्या वणव्याने जनावरांचा चारा नष्ट होतो. यामुळे ही जनावरे मिळेल ते खातात. अनेक वेळा लग्न सोहळ्याच्या वेळी बाहेर पडलेल्या पत्रावळ्यावरील अन्न खाल्ल्याने देखील जनावरांना विषबाधा होते. उन्हाळ्यातील तीव्र उष्म्याने जनावरांना त्रासदायक ठरत आहे.

आरोग्याच्या समस्या
तळपत्या उन्हात फिरल्याने आरोग्याच्या विविध समस्या उद्भवत आहेत. डोके दुखणे, ताप येणे, सर्दीचा त्रास, चक्कर अशी लक्षणे असलेले रुग्ण सध्या दवाखान्यात आढळून येत आहेत. महाड आणि परिसरात कधी नव्हे ते यावर्षी तापमानाचा पारा चढला आहे. याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे.

शक्यतो उन्हात फिरणे टाळावे, उष्माघाताची लक्षणे दिसल्यास सावलीमध्ये उभे राहावे, अंग थंड पाण्याने पुसावे, लहान मुलांना उन्हात पाठवू नये.
- डॉ. अजित पुल्ले,

महाडग्रामीण भागातील शेतकºयांनी आपली जनावरे सकाळी १० च्या आत सोडून पुन्हा गोठ्यात आणली पाहिजे, शिवाय जनावरांना देखील चांगले पाणी आणि चारा वेळेवर दिला पाहिजे. लसीकरण आणि वेळीच उपचार करून घेतल्यास जनावरे दगावण्याचे प्रमाण कमी होईल.
- डॉ. डी.एस.सोनावले,
सह आयुक्त पशुवैद्यकीय केंद्र
 

Web Title: 'Fever' of increasing temperature, heat and troubles to humans and pet animals