वणव्यांमुळे होतोय पर्यावरणाचा ऱ्हास; प्रशासनाकडून जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 23:13 IST2020-02-07T23:13:14+5:302020-02-07T23:13:41+5:30
वन्यजीव, वनसंपदेचा नाश

वणव्यांमुळे होतोय पर्यावरणाचा ऱ्हास; प्रशासनाकडून जनजागृतीची गरज
मोहोपाडा : वणवे लागत असल्याने शेतकरी आणि प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत. गावोगाव लावले जाणारे वणवे रोखण्याचे प्रशासनापुढे एक मोठे आव्हान उभे आहे. वणव्यामुळे वन्यजीव तसेच वनसंपदेचा ºहास होत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचा सूर निर्माण होत असून, यासाठी वणवाविरोधी अभियान राबवून जनजागृती करणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.
जानेवारी ते अगदी मे महिन्यापर्यंत कोकणात वणवे लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. दिवसेंदिवस वणवे लावण्याच्या या प्रवृत्तीत वाढच होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. पावसाळ्यात वाढलेले माळरानावरील गवत, वनस्पती तसेच डोंगरांवरील वनसंपदा यात पक्ष्यांची घरटी, मुंग्यांची वारुळे, वनात राहणारे पक्षी, सरपटणारे प्राणी या वणव्यांमध्ये होरपळून प्राणाला मुकत आहेत.
एखाद्या व्यक्तीने बेतालपणे लावलेल्या वणव्याची झळ अमर्याद पसरून त्यात शेकडो एकर जमिनीवरील वनसंपत्ती नष्ट होऊन ही माळराने व डोंगर ओसाड पडत आहेत. या वणव्यात वनसंपदेसह असंख्य वन्यजीव, जनावरेही नष्ट होत आहेत, त्याचा पर्यावरणावर विपरित परिणाम होत असल्याने पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.