सांस्कृतिक दहशतवाद पसरविण्याचे छुपे काम सुरू : रावसाहेब कसबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:50 IST2018-04-10T14:27:43+5:302018-04-10T14:50:32+5:30
संत तुकाराम नगर भागातील संस्था व संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते

सांस्कृतिक दहशतवाद पसरविण्याचे छुपे काम सुरू : रावसाहेब कसबे
पिंपरी : दलितांबद्दल प्रेम व आपुलकी असल्याचा दिखावा करणारे हे भाजप सरकार वास्तविकरित्या सांस्कृतिक दहशतवाद पसरविण्याचे छुपे काम करीत असल्याची टीका ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी आज येथे केली. संत तुकाराम नगर भागातील संस्था व संघटनांनी आयोजित व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रामध्ये ते बोलत होते.यावेळी माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा धर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे डॉ. अशोक शिलवंत, मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, अॅड. लक्ष्मण रानवडे, माजी महापौर योगेश बहल, नगरसेविका सुलक्षणा धर, बाळासाहेब ओव्हाळ, तसेच प्रभाकर ओव्हाळ, शरद जाधव, आर. डी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. कसबे म्हणाले, छत्रपतींची खरी उपेक्षा स्वकीयांनीच केली. मात्र, अठरापगड जातींच्या मावळयांच्या ताकदीवर त्यांनी राज्यकारभार करून कल्याणकारी राजा अशी प्रतिमा जगासमोर निर्माण केली. सध्याचे मोदी सरकार छत्रपतींचे नाव घेऊन संस्कृतीचे दमन करत आहेत. व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी सांगितले, खोटया इतिहासाच्या बनावावर समाजात धार्मिक दुही पसरविण्याचे काम भाजप सरकार करत आहेत. नव्या पिढीतील विदयार्थ्यांना खोट्या इतिहासाची मांडणी असणारे साहित्य व पुस्तके प्रवाहात आणण्याचे काम सध्या सुरू आहे. प्रास्ताविक लक्ष्मण रानवडे यांनी केले. तर डॉ. अशोक शिलवंत यांनी स्वागत केले. विजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रकाश जाधव यांनी आभार मानले.