दलित, आदिवासींनी कागदपत्रे कुठून आणायची?; अरुणा रॉय यांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 06:39 IST2020-01-13T02:13:27+5:302020-01-13T06:39:33+5:30
महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार प्रदान सोहळा

दलित, आदिवासींनी कागदपत्रे कुठून आणायची?; अरुणा रॉय यांची सरकारवर टीका
पुणे : संविधानाच्या विरोधात सरकार काम करते तेव्हा आवाज उठविल्यानंतर आम्हाला ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणून हिणवले जाते. आमची ओळख काय ती आम्हीच ठरवू. दुसऱ्यांनी ती ठरविण्याची गरज नाही. एनआरसी, एनपीआर आणि सीएए यामुळे केवळ मुस्लिमच नव्हे तर देशातील गरीब, दलित आणि आदिवासी यांचे काय होणार? त्यांनी कुठून कागदपत्रे आणायची? निर्णय घेण्याची ताकद संसदीय सदस्याच्या हातात देणे हीच लोकशाही आहे का?, असा सवाल माहिती अधिकार कायद्याच्या प्रणेत्या अरुणा रॉय यांनी विचारला आहे.
महाराष्ट्र फांडेशन (अमेरिका) यांच्यावतीने साहित्य व समाजकार्य पुरस्काराचे वितरण रॉय यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या पुरस्कार सोहळ््यात ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांना दिलीप चित्रे साहित्य जीवनगौरव पुरस्कार, कृ ष्णात खोत यांच्या रिंगण कादंबरीकरिता ग्रंथ पुरस्कार, नितीन रिंढे यांच्या लीळा पुस्तकांच्या याला अपारंपारिक गटातून ग्रंथ पुरस्कार, दत्ता पाटील यांच्या ‘हंडाभर चांदण्या’ या नाटकाला रा. शं. दातार पुरस्कार, केरळ साहित्य परिषदेला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, राजेंद्र बहाळकर यांना विशेष कृतज्ञता पुरस्कार, शहाजी गडहिरे यांना कार्यकर्ता पुरस्कार, जमिलाबेगम पठाण यांना मोहिनी केळकर स्मृती कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावर महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्काराचे प्रवर्तक सुनील देशमुख, महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव भालेराव उपस्थित होते.
रॉय म्हणाल्या, देश सध्या नाजुक स्थितीत आहे. युवा पिढीकडून आपल्याला आता प्रेरणा घ्यावी लागत आहे. एनसीआर, सीएए हे आम्हाला नको आहे. प्रास्ताविक डॉ. मनीषा गुप्ते यांनी केले. सूत्रसंचालन विनोद शिरसाठ यांनी केले. हमीद दाभोलकर यांनी आभार मानले.
महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका) यांच्यावतीने साहित्य व समाजकार्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी डावीकडून डॉ.मनीषा गुप्ते, विनोद शिरसाठ, दत्ता पाटील, कृष्णात खोत, नितीन रिंढे, वसंत आबाजी डहाके, अरुणा रॉय, ए.पी.मुरलीधरन, सुनील देशमुख, शहाजी गडहिरे, जमीलाबेगम पठाण इताकुला आणि राजेंद्र बहाळकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
काळोख असला तरी दिवट्या पेटत असतात
जो पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करावा, असे पोषक वातावरण नाही. धर्मसत्तेचे राजसत्तेवर आणि राजसत्तेचे अर्थसत्तेवर आक्रमण होते त्यावेळी परवड होते. जगण्याचा व स्वत:चा शोध सारखे प्रश्न गंभीर बनले आहेत. घनदाट काळोख असला तरी दिवट्या पेटत असतात, अशा शब्दांत डहाके यांनी भावना व्यक्त केल्या.