पुणे: औरंगजेबाची कबर गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देणारी आहे. महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर ही कबर काढावी. अन्यथा स्वभिमानी हिंदू समाज रस्त्यावर उतरत आंदोलन करेल, मोर्चे काढेल आणि आवश्यकता भासल्यास चक्का जाम करून कारसेवा करून ती कबर उध्वस्त करेल. असा इशारा बंजरंग दलाने राज्यशासनाला दिला आहे.
त्याचप्रमाणे ही कबर हटविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे. तिथी प्रमाणे सोमवार (दि.१७) रोजी छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती असून सकाळी ११.३० वाजता पुण्यासह राज्यातील तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणार आंदोलन करून मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देणार आहोत, अशी माहिती विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन, आणि प्रांत सह संयोजक संदेश भेगडे उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, आपले संपूर्ण आयुष्य दगाबाजी ,विश्वासघात व हिंदू द्वेष यात घालविणारा,आपल्या सख्या भावांचे खून करणारा,बापाला कैदेत टाकणाऱ्या, काशी विश्वनाथ,मथुरा,सोमनाथ मंदिरे फोडणारा ,छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे, त्यामुळे कबर हटवली पाहिजे.
औरंग्याचा करावा तितका निषेध कमी
स्वतःच्या वडीलांना तुरुंगात टाकून मारणारा, स्वतःच्या भावांची क्रूरतेने हत्या करणारा घरातल्या लोकांना सोडत नाही. त्याच्यासाठी राष्ट्रातले नागरिक व समाजाची काय किंमत असणार? अशा राष्ट्रघातकी, क्रूर आणि हिंसाचारी प्रवृत्तीच्या औरंग्याचा करावा तितका निषेध कमी असेल असेही यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.