अंधश्रद्धेचे जोखड झुगारताना...जठ निर्मूलनाचे अर्धशतक साजरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 15:41 IST2018-05-25T15:40:20+5:302018-05-25T15:41:01+5:30

जठ या अंधश्रद्धेकडे कुठेतरी दुर्लक्षच होत होते पण जोगवा चित्रपटामुळे ही प्रथा सर्वदूर पोचली आणि त्याविषयी जनजागृती व्हायला सुरुवात होती. अस्वच्छतेमुळे केसात  गुंत्यापासून झालेल्या या जठेने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले.

war against superstition of Jath by Anis | अंधश्रद्धेचे जोखड झुगारताना...जठ निर्मूलनाचे अर्धशतक साजरे

अंधश्रद्धेचे जोखड झुगारताना...जठ निर्मूलनाचे अर्धशतक साजरे

ठळक मुद्देअंनिसने चार वर्षात केले ५० महिलांचे जठनिर्मूलन पुण्यासह जिल्ह्याभरातल्या महिलांची केले जठेपासून मुक्ती

अंधश्रद्धेचे जोखड झुगारताना...जठ निर्मूलनाचे अर्धशतक 
पुणे :
या अंधश्रद्धेकडे कुठेतरी दुर्लक्षच होत होते पण जोगवा चित्रपटामुळे ही प्रथा सर्वदूर पोचली आणि त्याविषयी जनजागृती व्हायला सुरुवात होती. अस्वच्छतेमुळे केसात  गुंत्यापासून झालेल्या या जठेने अनेकांचे आयुष्य उध्वस्त केले. इच्छा असूनही जठेसोबत अनेक जणींना आयुष्य घालवावे लागते. मात्र गेल्या चार वर्षात ही परिस्थिती बदलली असून तब्बल ५० महिलांचे जठनिर्मूलन करण्यात आले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यात कार्यरत असून त्यांना पुणे जिल्ह्यात या निमित्ताने वेगवेगळे अनुभव आले आहेत. 

जठ एका समाजातल्या किंवा गरीब महिलेलाच होते हा पूर्णपणे गैरसमज आहे. अनेक समाजात आणि सर्व वय, शिक्षित, अशिक्षित स्त्रियांना याचा सामना करावा लागल्याचे अनुभव अंनिसकडे आहेत. अनेकदा ज्या व्यक्तीच्या डोक्यात जठ आहे तिला ती ठेवण्याची इच्छा नसते. पण कालांतराने घराच्या व्यक्ती, समाजाची बंधने यायला लागतात. देवाचा कोप होईल इथपासून तर अनेक कारणांनी  जठ ठेवण्याची सक्ती केली जाते. आणि अखेर जठेसह आयुष्याचा प्रवास सुरु होतो. ब्युटिशियन व्यक्ती खरं तर उत्तम पद्धतीने  जठ काढू शकते. पण भीतीमुळे किंवा व्यवसाय कमी होईल म्हणून कोणत्याही पार्लरमध्ये  जठ काढली जात नाही. अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षा आणि व्यवसायाने ब्युटिशियन असलेल्या नंदिनी जाधव यांनी हीच गोष्ट हेरली आणि स्वतःहून या कामात पुढाकार घेतला.

समोर आलेली पहिलीच केस १६ वर्षांच्या मुलीची होती. जठ आल्यामुळे तिला देवाला सोडणार होते. अखेर घरी जाऊन तिच्या नातेवाईकांची समजूत घालण्यात आली आणि  जठ काढली एका महिलेला तू  जठ काढली तर आजारी पती मरून जाईल अशी भीती दाखवण्यात आली. अखेर पती वारल्यावर तिने  जठ  ठेवून तो काही जगला नाही हे मान्य केले आणि जठ काढून टाकली. एका महिलेला जठ काढण्याची इच्छा असूनही सासू परवानगी देत नव्हती. अखेर तिच्या आजारपणात डॉक्टरांची याकरिता मदत घेण्यात आली. त्यांनी सासूला जठेमुळे सी टी स्कॅन करता येणार  नाही असे सांगितले आणि  जठ काढता आली. एका महिलेने तर जठ आल्यावर नवरा, कुटुंब, समाज सर्वांपासून लपवून ठेवली. घरातही ती महिला चोवीस तास स्कार्फ बांधून बसायची. अखेर अंनिस माहिती मिळाल्यावर तिने स्वतःहून जठनिर्मूलन करून घेतले. अंनिसने एकट्या पुणे जिल्ह्यात पन्नास  जठनिर्मूलन केले आहेत. जठ  काढण्यासाठी अनेक प्रकाराने समजवावं लागायचं. अनेकदा जाधव यांना शिव्या- शापही ऐकावे लागले.काही कुटुंबांना दोन-दोन वर्ष समजावण्यात गेले आहे. पण एकदा  जठ काढली मग मात्र ते कुटुंब अंनिसमय होऊन जात.  पुढच्या अनेक केस  त्यांच्यामार्फत जठ निर्मूलनासाठी आल्याचा अनुभव अंनिसला आहे. हा प्रवास खूप मोठा आहे याची जाणीव जाधव यांना आहे. पण जठेच्या अवजड जोखडात दबलेल्या महिलेची सुटका करणे त्यांना अधिक महत्वाचे वाटते. आज पोलीस, डॉक्टर असे अनेक घटक त्यांना मदत करतात. आम्ही सुरुवात तर केली आहे, आता हे चक्र संपेपर्यंत काम करणार असल्याचे सांगताना त्यांच्या आवाजात यशस्वी होण्याचा आत्मविश्वास जाणवतो. 

Web Title: war against superstition of Jath by Anis