पुणे : राज्यात मार्च व एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने मोठा कहर केला असून, तब्बल १ लाख ३१ हजार ४६५ हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. गहू, हरभरा पिकांसह फळपिके आणि भाजीपाला पिकांनाही मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
मार्च महिन्यात राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये १ लाख २२ हजार ९९७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन दिवसांत (दि. १ व २ एप्रिल) आणखी ८ जिल्ह्यांतील ८ हजार ४६८ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली. त्यामुळे अवकाळी पावसाचा एकूण फटका प्रचंड प्रमाणात वाढला आहे.
जिल्हानिहाय नुकसानीचा आकडेवारी पाहता आतापर्यंत नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, येथे ३३ हजार ४८१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल जळगाव जिल्ह्यात २४ हजार ९०२ हेक्टर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २३ हजार ६३३ हेक्टर क्षेत्रावरील पिके नष्ट झाली आहेत. रब्बी हंगामातील काढणीस आलेली गहू आणि हरभरा ही प्रमुख पिके अवकाळी पावसात भिजल्याने सडली आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याबरोबरच बाजारभावाचा फटकाही शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. परिणामी, आगामी खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले आहेत. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून, शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीत तातडीने आर्थिक मदत, कर्जमाफीसारखे दिलासादायक निर्णय आणि विमा भरपाई जलद गतीने मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
----------
जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये) (मार्च व एप्रिल)
कोल्हापूर १६
सातारा ३४२
सांगली १९४४
नागपूर ८२
भंडारा ४०१
चंद्रपूर २०२
गोंदिया ३३
गडचिरोली ३५७
लातूर ४२१
नांदेड ५०२
धाराशिव १४०७
अमरावती ७०८
अकोला ९३१
वाशिम १२०
बुलढाणा १००८३
यवतमाळ १९१
पुणे १७८५
सोलापूर २४३९
अहिल्यानगर २३६३३
नाशिक ३३४८१
धुळे १५९५८
नंदुरबार ४७१
जळगाव २४९०२
संभाजीनगर ८४४५
जालना १८०२
बीड ४७८
रत्नागिरी ६०
सिंधुदुर्ग २
एकूण १३१४६५
Web Summary : Unseasonal rains in Maharashtra have severely damaged 1.31 lakh hectares of Rabi crops. Nashik, Jalgaon, and Ahilyanagar districts are the worst affected. The state government has ordered immediate assessments and promised assistance to farmers facing economic hardship. Farmers are demanding quick financial aid and loan waivers.
Web Summary : महाराष्ट्र में बेमौसम बारिश से 1.31 लाख हेक्टेयर रबी फसलें तबाह हो गई हैं। नासिक, जलगाँव और अहिल्यानगर जिले सबसे अधिक प्रभावित हैं। राज्य सरकार ने तत्काल आकलन का आदेश दिया है और आर्थिक संकट का सामना कर रहे किसानों को सहायता का वादा किया है। किसान त्वरित वित्तीय सहायता और ऋण माफी की मांग कर रहे हैं।