पुणे : ‘निसर्ग संवर्धनावर लक्ष केंद्रित करुन पुढच्या पिढीला निरोगी भविष्य देण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. निरोगी व स्वच्छ भारताचे ध्येय गाठण्यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन योग्यरित्या करायला हवे. कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प दीर्घकाळ टिकत नाहीत. बायोगॅससारखे प्रकल्प योग्य पद्धतीने अंमलात आणले, तर ते वषार्नुवर्षे सुरळीतपणे चालतात. यासाठी घनकचरा व्यवस्थापनाची शाश्वत प्रणाली समजून घ्यायला हवी’, असे प्रतिपादन घनकचरा व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. समीर शास्त्री यांनी केले. मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात आयोजित व्याख्यानमालेत डॉ. समीर शास्त्री ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी परिषदेचे सहकार्यवाह संजय मालती कमलाकर, विज्ञानशोधिकेच्या सहसंचालिका भारती बक्षी उपस्थित होते.शास्त्री म्हणाले, ‘पुण्यातील नद्यांची परिस्थिती, उरुळी देवाची याठिकाणी असणारे कचऱ्याचे ढीग हे दिवसेंदिवस वाढत आहेत. परिणामी, अनेक प्राणघातक आजारांना आपल्याला सामोरे जावे लागते. म्हणूनच निसर्ग समजायला, वाचायला शिकले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने जागतिक आणि स्थानिक पातळीवर विचार करून वैयक्तिक उपाय शोधायला हवेत. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन नीट व्हायला हवे.’संजय मालती कमलाकर यांनी प्रास्ताविक केले. मुक्तांगण विज्ञानशोधिकेच्या भारती बक्षी यांनी सूत्रसंचालन केले. अशोक सागर यांनी आभार मानले.
घनकचरा व्यवस्थापन प्रणाली समजून घ्यावी : समीर शास्त्री; मराठी विज्ञान परिषदतर्फे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 14:01 IST
मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) आणि मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सेनापती बापट रस्त्यावरील विज्ञानशोधिकेच्या सभागृहात व्याख्यानमाला.
घनकचरा व्यवस्थापन प्रणाली समजून घ्यावी : समीर शास्त्री; मराठी विज्ञान परिषदतर्फे कार्यक्रम
ठळक मुद्दे‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर विज्ञानशोधिकेच्या सभागृहात व्याख्यानमालाबायोगॅससारखे प्रकल्प योग्य पद्धतीने अंमलात आणले, तर वषार्नुवर्षे चालतात सुरळीत : शास्त्री