पुणे: कारागृह व सुधार सेवा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांना वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण चांगलेच भोवले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याबाबत तसेच वैष्णवीचा पती शशांक याला शस्त्र पुरविण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सुपेकर यांची अखेर मुंबईत होमगार्डच्या उपमहासमादेशकपदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बदली करताना सुपेकर यांचे हे पद अवनत करण्यात आले आहे. त्यामुळे सुपेकर यांच्यावर मोठी नामुष्की ओढविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात विलंब झाला, असा आरोप करण्यात येत होता. त्यात जालिंदर सुपेकर यांचा हात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. हगवणे कुटुंबीय आपले दूरचे नातेवाईक असून या प्रकरणात आपला कोणताही सहभाग नसल्याचा खुलासा सुपेकर यांनी तातडीने केला होता. मात्र, या संदर्भात राज्य सरकारलाही दखल घ्यावी लागल्याने गृह विभागाने गुरुवारी सुपेकर यांच्याकडील नाशिक, संभाजीनगर व नागपूर येथील उपमहानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कार्यभार काढून घेतला होता. त्यानंतर शशांक हगवणे याने शस्त्र परवाना देताना बनावट रहिवासाचे पुरावे दिल्याप्रकरणी शुक्रवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा शस्त्र परवाना देताना तत्कालीन अतिरिक्त आयुक्त म्हणून जालिंदर सुपेकर कार्यरत होते. त्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शस्त्र परवाना देण्यात सुपेकर यांचा सहभाग असल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असे पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याच्या काही मिनिटांतच सुपेकर यांच्या तडकाफडकी बदलीचे आदेश गृह विभागाने काढले. सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक असताना त्यांना होमगार्डचे उपमहासमादेशक म्हणून बदली करण्यात आली आहे. हे पद अवनत करून सुपेकर यांना देण्यात आले आहे. आता या प्रकरणात सुपेकर यांच्यावर आणखी काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.