पुणे: राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. तसेच राज्यातील बसस्थानक व परिसर स्वच्छ व उत्तम सोयी-सुविधांनी युक्त असावेत, बसस्थानकातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
परिवहन विभागाची आढावा बैठक गुरुवारी मुंबईत घेण्यात आली. यावेळी परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक नंदकुमार कोळकर, अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
सोबतच बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्या. निवासस्थानाच्या प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. याबरोबरच बसस्थानकावर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, शिवाय लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी पुढील काळात अनेक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.