पुणे: मेक इन इंडिया, व्होकल फॉर लोकल अशा घोषणा वारंवार करणाऱ्या केंद्र सरकारने लघु, सुक्ष्म, मध्यम उद्योजकांची १५ टक्के सबसिटी मागील २ वर्षांपासून बंद केली आहे. ती त्वरित सुरू करावी व त्यानंतरच घोषणा कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सबसिडी बंद केल्यामुळे या नवउद्योजकांना आपल्या उद्योगाचा विस्तार वाढवणे अशक्य झाले असल्याची तक्रार पक्षाने केली आहे.पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, केंद्र सरकार वारंवार उद्योग क्षेत्रात सरकारी धोरणाने फार मोठी वाढ झाली असल्याचे सांगत आहे. मेक इन इंडिया वगैरे घोषणा त्यासाठी केल्या जात आहेत.याच अंतर्गत सरकारने नवउद्योजकांना यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी, आहे ती यंत्र अद्ययावत करण्यासाठी म्हणून १५ टक्के सबसिडी जाहीर केली होती. काही महिने ती सुरू होती. मात्र, त्यानंतर अचानक थांबवण्यात आली. त्यालाही आता २ वर्षे झाली. सबसिडी बंद केल्याने या उद्योजकांना आता भांडवल उभारणी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ही सबसिडी सुरू करावी, त्यात किमान ५ टक्के वाढ करावी, अशी मागणी जोशी यांनी केली.
उद्योजकांची सबसिडी २ वर्षांपासून बंद;काँग्रेसची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:34 IST