पुणे: पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदरच आहे, पण त्यांचे दिवे लावाचे आवाहन अशास्त्रीयच आहे, त्यामुळे त्याचे पालन करण्याचा प्रश्नच येत नाही, ऊलट नागरिकांनी विद्यूत दिवे बंद करून विजेची समस्या निर्माण करू नये असे आवाहन शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांंनी केले.नागरिकांबरोबरच कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घरातील विद्यूत दिवे बंद करू नयेत असे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड म्हणाले, विषयाचे गांभीर्य केंद्र सरकारला नाही हेच यातून सिद्ध झाले. एकतर केद्रीय मंत्रीमंडळ काय करते आहे तेच समजत नाही. आरोग्यमंत्री, ग्रुहमंत्री यांचे काही अस्तित्व दिसायला तयार नाही. पंतप्रधान दिसत आहेत तर ते असे अविवेकी आवाहन करत आहेत. विजेचे दिवे असे अचानक बंद झाले तर त्यातून विजेची गंभीर समस्या निर्माण होईल असे त्या विषयातील तज्ञ सांगत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून भाजपाचे कार्यकर्ते आता हा नवा कार्यक्रम राबवणार. त्याने काय होणार याचे ऊत्तर देशाला मिळणार आहे का?राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे म्हणाले, पंतप्रधानांनी असे अशास्त्रीय आवाहन.करावे याचे आश्चर्य वाटते.सगळे जग या आजाराचा सामना करण्यासाठी विज्ञानाची कास धरते आहे आणि आपले पंतप्रधान टाळ्या थाळ्या वाजवायला व विजेचे दिवे बंद करून मेणबत्या पेटवायला सांगत आहेत. त्याऐवजी त्यांनी जनतेला आपण ही लढाई जिंकण्यासाठी कायकाय करतो आहोत ते सांगून जनतेला धैर्य, दिलासा द्यायला हवा होता. मी स्वत: दिवे बंद करणार नाही व मेणबत्त्या, टॉर्च ही लावणार नाही. कार्यकर्त्यांनी व जनतेनेही हेच करावे. शास्त्रीय दृष्टिकोन आहे असा कोणीही विवेकी माणूस हे करणारच नाही.शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, या आवाहनाला काही अर्थच नाही. पंतप्रधान फार शक्तीशाली व्यक्ती असते. त्यांना मिळालेल्या अधिकारांनी त्यांना तसे बनवलेले असते. टाळ्या आणि थाळ्या वाजवून एक दिवसाच्या संचारबंदीवर पाणी ओतले गेले. तो अनूभव गाठीला असताना त्यांनी पुन्हा असे विचित्र आवाहन करण्याची गरज नव्हती. जनतेला आज विज्ञाननिष्ठ प्रयत्नांची गरज आहे. तेच करावे असे आमचे कार्यकर्त्यांना आणि नागरिकांनाही आवाहन आहे.
पंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 14:28 IST
ऊलट नागरिकांनी विद्यूत दिवे बंद करून विजेची समस्या निर्माण करू नये ; काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आवाहन
पंतप्रधानांबद्दल आदर ;पण... त्यांचे विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन अशास्त्रीयच
ठळक मुद्देनागरिकांबरोबरच कार्यकर्त्यांनीही त्यांच्या घरातील विद्यूत दिवे बंद करू नयेत