रक्तपिशव्यांचे दर कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:19 IST2018-06-13T16:19:16+5:302018-06-13T16:19:16+5:30
रक्तहितवर्धिनी संघटनेने पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे अशी मागणी केली आहे.

रक्तपिशव्यांचे दर कमी करा
पुणे : रक्तदानात दान हा शब्द आहे. तरीही साठवणुकीचे माफक दर घेणे योग्य आहे. मात्र, सध्या असलेले रक्तपिशवीचे दर अवाजवी वाढवलेले आहेत. जागतिक रक्तदान दिनाचे महत्व लक्षात घेऊन त्यादिवशी ( दि. १४ जून) खासगी तसेच सरकारी रक्तपेढीतील रक्तपिशव्यांचे दर कमी करावेत अशी मागणी रक्तहितवर्धिनी संघटनेने पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली. त्यांनी संघटनेला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
संघटनेच्या वतीने यासंदर्भात मुंबईत बापट यांची भेट घेण्यात आली. रक्तपिशवीची दरवाढ कमी करावी, प्रत्येक रक्तपिढीत रोजच्या साठ्याची माहिती दर्शनी भागात जाहीर करावी, रक्तपिशवी देताना घेतलेली अनामत रक्कम रिफंडेबल असावी, शहराच्या स्तरावर रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी संयोजन समिती स्थापन करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी नगरसेवक महेश लडकत तसेच विजय मार्केचा, कुमार शिंदे, धनंजय झुरंगे, गौतम माधरिया, समीर पवार, राहल राक्षे, राजय यादव आदी यावेळी उपस्थित होते.
अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे म्हणाले, रक्तदान हे आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. ऐनवेळी रक्ताची गरज निर्माण झाल्यास त्याचा तुटवडा भासतो. त्यामुळे उपलब्ध साठ्याची किंमत वाढवण्यात येते. रक्तासारख्या अतिशय महत्वाच्या गोष्टीचे असे व्यावसायिकरण होणे चुकीचे आहे. त्याचा दर माफक असणेच योग्य आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे. मुंबई भेटीत त्यांनी संघटनेला तसे आश्वासन दिले आहे.