सासवड :पुरंदर तालुक्यात नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून आमच्या प्रेतावरूनच विमानतळ होईल अशी शपथ हजारो शेतकऱ्यांनी घेतली. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पारगाव मेमाणे येथे प्रकल्पविरोधी सभा पार पडली. ज्यात सातही बाधित गावातील शेतकऱ्यांनी सरकारविरोधात लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी राज्यकर्त्यांवर कडाडून टीका ते म्हणाले की,हा विमानतळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी नाही, तर मोठ्या उद्योगपतींसाठी आहे. सरकार आणि पुढारी सत्य लपवून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. एकदा जमिन गेली, की कोणीही शेतकऱ्यांची विचारपूस करणार नाही.यावेळी त्यांनी शासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. नुकतेच राज्य सरकारने पारगाव, एखतपूर, खानवडी, मुंजवडी, कुंभारवळण, वनपूरी, उदाचीवाडी या गावांसाठी भूसंपादन प्रक्रियेची माहिती जाहीर केली, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, या सात गावांना औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करून जमिनीच्या खरेदी-विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. हे या निर्णयामागील गुप्त हेतू उघड करणारे असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
पुरंदर विमानतळ आमच्या प्रेतावरूनच होईल; पुरंदरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार
By प्रीती फुलबांधे | Updated: March 20, 2025 19:07 IST