पुणे : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये अल्प वाढ झाली आहे. दरवर्षी साधारणत: जुलैमध्ये पाणी साठण्यास सुरुवात होते. यंदा पूर्वमोसमी तसेच मॉन्सून लवकर आल्याने पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्या चारही धरणांमध्ये एकूण ५.७४ टीएमसी पाणीसाठा आहे.
खडकवासला धरण प्रकल्पातील टेमघर, पानशेत, वरसगाव व खडकवासला ही धरणे मागील वर्षी १०० टक्के भरली होती. यंदा मात्र, मार्च आणि एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढल्याने शहरात पाण्याची मागणी वाढली होती. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाने शहरात, तसेच घाटमाथ्यावर हजेरी लावली. त्यातच गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी धरणसाठ्यात वाढ दिसून आली आहे. खडकवासला धरणात मंगळवारी २४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सध्या धरणात ०.९८ टीएमसी पाणीसाठा असून, हे प्रमाण ४९.४२ टक्के इतके आहे.
धरणात ४८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. पानशेत धरणात मंगळवारी २५ मिलिमीटर पाऊस झाला असून, धरणात सध्या १.९० टीएमसी (१७.८४ टक्के) पाणीसाठा आहे. वारसगाव धरणात १७ मिलिमीटर पाऊस झाला असून, एकूण साठा २.७२ टीएमसी (२१.२४ टक्के) आहे. धरणात २६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. टेमघर धरणात १५ मिलिमीटर पाऊस झाला असून ०.१४ टीएमसी (३.८८ टक्के) पाणीसाठा आहे. दिवसभरात चारही धरणांमध्ये एकूण ५ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. सध्या या चार धरणांमध्ये एकूण ५.७४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे, जो एकूण क्षमतेच्या १९.७० टक्के आहे. गेल्यावर्षी याच तारखेला हा साठा १९.५९ टक्के होता.