पुणे : शेकडो वर्षांच्या वारीमध्ये कधीही घडली नाही अशी बलात्कारासारखी घटना घडली. त्याशिवाय राज्यात सातत्याने गुन्हेगारी वाढते आहे. गृहखात्याचा वचक संपल्यामुळेच हे होत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली. दौंड परिसरातून वारी जात असताना ही घटना घडली, शिवाय मुलीसोबत असलेल्या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना लुटण्यात आले.
पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले की स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखाते आहे. त्यांचा केवढा तरी वचक पाहिजे, मात्र सातत्याने राजकारण, सत्कार, विरोधकांमध्ये फोडाफोडी अशा गोष्टींमध्ये ते गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांचा गृहखात्यात कसलाच वचक नाही. त्यांची ही निष्क्रियता राज्यातील जनतेला त्रासदायक होत आहे.आता किमान त्यांनी दौंडमधील घटनेत असलेल्या गुन्हेगारांचा शोध घ्यावा तसेच अशी निंद्य घटना घडल्याबद्दल विठ्ठलाची माफी मागावी, अशी मागणी जगताप यांनी केली.