पवनानगर - पवन मावळात गेल्या ४८ तासांपासून अतिमुसळधार पाऊस सुरु आहे. पवना धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी शनिवारी (२६ जुलै ) सकाळी ११ वाजता ७,१४० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी, पवना नदीवरील कोथुर्णे जवळील पूल आणि काले येथील स्वयंभू मंदिर पाण्याखाली गेले आहे.पवना धरणातून सध्या ७,४१० क्युसेक वेगाने पवना नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन संनियंत्रण अधिकारी, मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्ष, पुणे यांनी केले आहे. जोरदार पावसाने ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला असून, अनेक ठिकाणी नागरिकांना मुसळधार पाण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.या विसर्गामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगर बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. परिणामी, दुग्धव्यवसायिक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना शिवली, ब्राम्हणोली किंवा कडधे मार्गे पवनानगर आणि कामशेतकडे प्रवास करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अडचणीत आले आहेत.धरण प्रशासनाने स्पष्ट केले की, पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने विसर्ग कमी-जास्त होऊ शकतो. त्यामुळे पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना नदीपात्रात उतरू नये, तसेच पाण्याचे पंप, शेती अवजारे आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
पवना नदीला पूर: कोथुर्णे पूल पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:15 IST