नवनियुक्त आयुक्तांची भेट घेत चंद्रकांत पाटलांनी वाचला पुण्यातील अडचणींचा पाढा
By किरण शिंदे | Updated: June 2, 2025 13:09 IST2025-06-02T13:08:56+5:302025-06-02T13:09:39+5:30
पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, नुकतेच मंजूर झालेले ४०० कोटी रुपयांचे रस्ते काम अद्याप सुरु न होणे ही गंभीर बाब असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

नवनियुक्त आयुक्तांची भेट घेत चंद्रकांत पाटलांनी वाचला पुण्यातील अडचणींचा पाढा
पुणे - पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम यांची भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी यांनी सदिच्छा भेट घेऊन शहराच्या विविध समस्या व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीत प्रामुख्याने प्रभागरचना, निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांवर आधारित नियोजन, तसेच महापालिकेतील सध्याची स्थिती याबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून पुणे महापालिकेत नगरसेवक नसल्यामुळे स्थानिक प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या समस्या वेळेवर ऐकून घेणं आणि त्यावर त्वरित कारवाई करणं कठीण झालं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
रस्त्यांची दयनीय स्थिती आणि निधीचा अपव्यय
पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, नुकतेच मंजूर झालेले ४०० कोटी रुपयांचे रस्ते काम अद्याप सुरु न होणे ही गंभीर बाब असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या कामांमध्ये राजकीय यंत्रणांच्या हस्तक्षेपामुळे अडथळे येत असल्याची तक्रार त्यांनी आयुक्तांसमोर मांडली.
पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करण्याचे निर्देश
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. "एका पावसात नाले तुंबत असतील, तर नागरिकांच्या समस्या अधिकच वाढतील. त्यामुळे पावसाळ्याची वाट न बघता आधीच तयारी केली पाहिजे," असा सल्ला त्यांनी आयुक्तांना दिला.
ट्रॅफिक, अतिक्रमण आणि अधिग्रहणावर भर
पुण्यातील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण हे देखील शहरवासीयांसाठी गंभीर समस्या बनल्या आहेत. "या बाबतीत महापालिकेने दीर्घकालीन आणि प्रभावी धोरण आखले पाहिजे. अधिग्रहणाची प्रक्रिया सुलभ करणे आणि अतिक्रमणावर कठोर पावले उचलणे गरजेचे आहे," असं पाटील यांनी नमूद केलं.
पुणे मेट्रो आणि स्वच्छता मोहिमेवर भर
पुणे मेट्रोच्या कामांबाबत सुद्धा अनेक बैठकांची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. "योजना संथगतीने सुरु आहेत, त्यामुळे त्याला गती देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सहकार्याने आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेने हे शक्य आहे," असे ते म्हणाले.
त्याचबरोबर ‘स्वच्छ कसबा’ मोहिमेचा उल्लेख करत, स्वच्छतेच्या बाबतीत पुण्याने ‘इंदोर’च्या धर्तीवर पुढे जाणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले. “स्वच्छता ही फक्त अभियान न राहता ती नागरिकांच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवी,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.