पुणे : हडपसर येथील उन्नतीनगर कालव्यात एकाचा मृतदेह आढळला होता. चांगले पोहता येऊनही पतीचा पाण्यात पडून मृत्यू कसा होईल, अशी शंका फिर्यादींनी व्यक्त करून त्याच्या खुनाचा संशय व्यक्त केला होता. शवविच्छेदनात मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल आला होता. सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिकलगार याबाबत धागेदोरे तपासून एक वर्षाने हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला.
विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी वैभव मनोज जाधव (वय ४२, रा. साक्षी लॉन्स, कमळापूर रोड, छत्रपती संभाजीनगर) आणि आशिष यांच्यावर गुन्हा दाखल झाला. स्वारगेट येथील लक्ष्मी कॅनॉलपासून हा कॅनॉल भूमिगत जातो. तो थेट हडपसरला उघडा होतो. त्यामुळे विनोद शार्दुल यांना चांगले पोहता येत असले तरी दोघांनी त्यांना मारहाण करून कालव्यात टाकून दिले. कालवा भूमिगत असल्याने त्यांना बाहेर पडायला संधी मिळाली नाही. त्यातच त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना स्वारगेट येथील लक्ष्मी कॅनॉलजवळ ४ मे २०२४ रोजी घडली होती.
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक हसीना शिकलगार यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हडपसर पोलिस ठाण्यात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद होती. मुंबईतील जेजे हॉस्पिटलच्या अहवालातही पाण्यात बुडून मृत्यूची नोंद होती. नंतर विनोद शार्दुल यांच्याबरोबर केटरिंगच्या कामात कोण कोण होते, याची माहिती घेतली असता, वैभव जाधव आणि आशिष हे बेपत्ता आढळले. वैभव जाधव याच्या आईकडे चौकशी केल्यावर तिने तिघांत भांडण झाल्याचे सांगितले. यावेळी आम्ही दोघांनी विनोद शार्दुलला मारहाण करून कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात टाकून दिल्याचे आईला सांगितले होते.