पुणे : कोथरूड मतदारसंघातील अनियमित पाणीपुरवठ्यावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील चांगलेच संतप्त झाले. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, नियमित पाणीपुरवठा करा. पाणी ही अत्यावश्यक बाब असल्याने नागरिकांना त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्यास कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा दिला.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्यासंदर्भात महापालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी, व्हॉलमन आणि नागरिक अशी संयुक्त बैठक कोथरूडमधील अंबर हॉल येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, कार्यकारी अभियंता शंकर कोडुसकर, कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे विजय नायकल, वारजे-कर्वेनगरचे दीपक राऊत, औंध-बाणेरचे गिरीश दापकेकर, भाजप कोथरूड दक्षिण अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर यांच्यासह सर्व माजी नगरसेवक तथा पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, व्हॉलमन उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला चंद्रकांत पाटील यांनी पाणीपुरवठा करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यात माजी नगरसेवकांनी अनियमित पाणी पुरवठ्याच्या तक्रारींचा पाढाच वाचला. बालेवाडी गावठाणमध्ये काही ठिकाणी दहा-दहा दिवस पाणीपुरवठा होत नाही. तर एसएनडीटी येथील समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाण्याची टाकी उभारली असली, तरी ते काम निकृष्ट झाले असून, टाकी सुरू होण्यापूर्वीच गळती लागल्याचे निदर्शनास आणून दिले.
अनेक भागांत पाणीपुरवठा करणारे कर्मचारी कामात कुचराई करत असल्याचे निदर्शनास आणले. त्यावर पाटील यांनी संतप्त होत अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. "पुणे महापालिकेच्या २४×७ योजनेअंतर्गत पहिली पाण्याची टाकी बाणेर-बालेवाडीमध्ये कार्यान्वित झाली. त्यानंतर उर्वरित पुण्याला मार्गदर्शक ठरेल. पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. समान पाणीपुरवठ्यासाठी प्रत्येक घरात मीटर लावण्याचा निर्णय झाला असून, त्याचेही काम सुरू होईल, असे पाटील यांनी सांगितले.