अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस
By राजू इनामदार | Updated: May 30, 2025 18:47 IST2025-05-30T18:46:51+5:302025-05-30T18:47:02+5:30
केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले

अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस
पुणे: तीर्थस्थळांचा विकास, समान न्याय, महिलांची सैनिकी तुकडी, स्वदेशी शस्त्रात्रांची निर्मिती या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या आदर्श राज्यकारभाराप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही काम सुरू आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशात खरी आत्मनिर्भरता त्यांनीच आणली असे ते म्हणाले.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रीशताब्दीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा संवाद कार्यक्रमाचे शुक्रवारी दुपारी मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानात आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उपस्थित युवकांशी संवाद साधला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे व भाजपचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
फडणीस म्हणाले, “पतीनिधनानंतर सासरे मल्हारबा होळकर यांनी अहिल्यादेवींना सती जाऊ न देता राज्यकारभार करण्याचा आदेश दिला. तो त्यांनी पाळला. सलग २८ वर्षे त्यांनी राज्य केले. राजमाता असूनही त्यांनी साधी राहणी आचरली. त्यांनी असा कारभार केला की आजही त्याचा आदर्श कायम आहे. तीर्थस्थळांचा त्यांनी विकास केला. केंद्र सरकारला काशी विश्वेश्वर स्थळी विकासकामे करता आली, याचे कारण तिथे अहिल्यादेवींनी आधीच कितीतरी कामे केली होती. महिलांची स्वतंत्र सैनिकी तुकडी करून त्यांना संरक्षणाचे काम देणाऱ्या त्या महाराणी होत्या. शस्त्रात्रांचे संशोधन तर त्यांनी केलेच, शिवाय त्याचे कारखानेही काढले. सर्वांना समान न्याय हे त्यांच्या कामकाजाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच २८ वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या राज्याकडे कोणीही वाकडी नजर टाकू शकले नाही.”
पंतप्रधान मोदी यांनीही ऑपरेशन सिंदूर ची ब्रिफिंग करण्याचे काम दोन महिला सैनिकी अधिकाऱ्यांना दिले. आपण विकसीत केलेल्या ब्रह्मोस या प्रणालीने पाकिस्तानचे एअरबेस उध्वस्त केले. मोदींनी राम मंदिराचे पुनर्निमाण केले. केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले. अहिल्यादेवींच्या कामाचा आदर्श युवकांनी घ्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे महाराज असूनही कशाचाही उपभोग न घेणारे श्रीमंत योगी होते, अगदी त्याप्रमाणेच अहिल्यादेवीसुद्धा राजमाता, महाराणी असूनही अतीशय साध्या रहात असत. कोणत्याही संपत्तीचा किंवा श्रीमंतीचा त्यांनी उपभोग घेतला नाही. देवभक्ती करत त्या कारभार पहात असत असे फडणवीस म्हणाले.