प्रकाश आंबेडकर तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत - सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:48 IST2018-03-27T02:48:28+5:302018-03-27T02:48:28+5:30
संभाजी भिडेंना मुख्यमंत्री, पंतप्रधानांचे अभय

प्रकाश आंबेडकर तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत - सुशीलकुमार शिंदे
पुणे : संभाजी भिडे यांना अटक करण्याची गरज असून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहे, असा थेट आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.
पुण्यात महाराष्ट्राच्या पहिल्या मंत्रिमंडळातील मंत्री बी. जे. खताळ पाटील यांच्या शतकमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी ते आले होते. या वेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. भीमा कोरेगाव घटनेविषयी त्यांना विचारले असता त्यांनी एकबोटेंना एक न्याय आणि भिडे यांना वेगळा न्याय दिला जात असण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. प्रकाश आंबेडकर तथ्य असल्याशिवाय बोलणार नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागणीची दखल घेत कारवाई करावी, असेही त्यांनी सुचवले.
अँट्रॉसिटी कायद्याच्या धोरणावर प्रतिक्रिया देताना शिंदे यांनी सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन केले. याबाबत लवकरात लवकर पुनर्याचिका दाखल करण्यात यावी अन्यथा आंदोलने होऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. लिंगायत समाजाला कर्नाटक सरकारने दिलेल्या अल्पसंख्याक दर्जावरही त्यांनी भाष्य केले.
या निर्णयाबद्दल कर्नाटक सरकारचे अभिनंदन केले. ही मागणी घेऊन लिंगायत समाजाचे लोक माझ्याकडे आले होते, असेही ते म्हणाले.