सांस्कृतिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण : श्रीपाल सबनीस, मुक्तरंग पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 17:56 IST2017-12-25T17:52:52+5:302017-12-25T17:56:35+5:30

राजकीय लोकशाहीचा प्रयोग सांस्कृतिक लोकशाहीशिवाय अपूर्ण असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.  मुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

Political democracy incomplete without cultural democracy: Shripal Sabnis, Muktarang award distribution | सांस्कृतिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण : श्रीपाल सबनीस, मुक्तरंग पुरस्कार वितरण

सांस्कृतिक लोकशाहीशिवाय राजकीय लोकशाही अपूर्ण : श्रीपाल सबनीस, मुक्तरंग पुरस्कार वितरण

ठळक मुद्देमुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळाराज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी बहारदार कविता सादर करून रसिकांची जिंकली मने

पुणे : जीवनातील प्रत्येक श्वासात कवितेचा ध्यास पेरणाऱ्या नव्या प्रतिभा आता पुण्या-मुंबई ऐवजी महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून जन्माला येत आहेत. या नव्या अंकुरांना जुन्या जाणकरांनी तांब्या भरून पाणी घालावे आणि मराठी संस्कृतीचा मळा फुलवावा. तळातील नवे उन्मेषक सांस्कृतिक लोकशाही समृद्ध करीत आहेत. राजकीय लोकशाहीचा प्रयोग सांस्कृतिक लोकशाहीशिवाय अपूर्ण असतो, असे मत माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. 
मुक्ताई प्रतिष्ठान, पुणेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मुक्तरंग पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याचे हे दुसरे वर्ष होते. सोहळ्यात  सुशीलकुमार शिंदे (कवितासंग्रह : शहर आत्महत्या करायचं म्हणतंय), : ऐश्वर्य पाटेकर (कादंबरी; जू) शंकर विभूते, (कथासंग्रह : आडवाट) हे पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत.  दत्ता घोलप (समीक्षा), सुमित गुणवंत (कविता) यांना उदयोन्मुख पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहित्य व  सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आकाश आप्पा सोनावणे आणि हृदयमानव अशोक यांचा विशेष  सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राजाभाऊ भैलुमे,  प्रमोद आडकर, वि. दा. पिंगळे, राजेंद्र वाघ, शिरीष चिटणीस, म. भा. चव्हाण, महेंद्रकुमार गायकवाड, सर्वेश तरे, अंकुश आरेकर, डॉ. रामचंद्र काकडे, रवींद्र कांबळे, शुभम वाळूंज, दीप पारधे, बबन पोतदार, अजय बिरारी  हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, समाजात विविध प्रमाणात विधायक कर्तृत्वाचे डोंगर उभे करणारे साहित्यिक कलावंत विचारवंत हे समाजाचे मानदंड असतात. असे सांस्कृतिक नायक सन्मान पुरस्काराने सन्मानित करणे समाजाचे कर्तव्य असते. समाजाने संस्कृतीचे शुद्धीकरण केल्याशिवाय राजकीय आणि सामाजिक व्यवस्था सुधारणार नाही. उपेक्षित प्रवाहातून येणारे नवे साहित्यिक समाजाने स्वीकारले आणि गौरविणे सर्वार्थाने आवश्यक आहे.
या समारंभासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कवींनी भीमराव कोते यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या बहारदार कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. कविसंमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द गझलकार दत्तप्रसाद जोग यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन चंदनशिवे आणि जित्या जाली यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब घोंगडे यांनी केले तर आभार संस्थापक अध्यक्ष सागर काकडे यांनी मानले.

Web Title: Political democracy incomplete without cultural democracy: Shripal Sabnis, Muktarang award distribution