पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:45 IST2025-04-24T09:43:47+5:302025-04-24T09:45:56+5:30
देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे

पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात शोककळा पसरली असून, संतापाची लाट उसळली आहे.
आज पहाटे संतोष जगदाळे व कौस्तुभ गनबोट यांचे पार्थिव पुण्यात त्यांच्या राहत्या घरी पोहोचवण्यात आले. यावेळी कर्वेनगर परिसरात शोकाकुल वातावरण होते. शेकडो नागरिक, नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संतोष जगदाळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त करताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली.
कुटुंबियांनी सांगितले की, "हल्ल्यानंतर वेळेवर मदत मिळाली नाही. आरोग्य सेवा आणि सुरक्षा यंत्रणा पुरेशा नसल्यामुळे माझ्या वडिलांचा जीव गेला. हा गंभीर मुद्दा आपण संसदेत मांडावा."
हा दहशतवादी हल्ला केवळ एका कुटुंबाचे नुकसान नाही, तर देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत गंभीर प्रश्न निर्माण करणारा प्रकार आहे, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.