"सरकार पडणार याशिवाय विरोधकांकडे दुसरा कुठला मुद्दाच नाही!" खासदार सुप्रिया सुळेंचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 15:55 IST2020-12-01T15:26:29+5:302020-12-01T15:55:38+5:30
विरोधकांना आरोप करण्याचा अधिकार आहे पण प्रत्यक्षात तुम्ही राज्यात जाऊन पाहिले तर अशी परिस्थिती नाही.

"सरकार पडणार याशिवाय विरोधकांकडे दुसरा कुठला मुद्दाच नाही!" खासदार सुप्रिया सुळेंचा टोला
बारामती: महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर उत्तम काम करत आहे. गेल्या वर्षभराच्या काळात महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केलेले आहे. कोविड, अतिवृष्टी यासारख्या अडचणी व संकटावर सरकारने यशस्वी मात केली.परदेशातील लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा जी माहिती त्यांना दिली जाते, त्यातही महाराष्ट्राने उत्तम काम केल्याचेच नमूद केलेले आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडी सरकारचे कौतुक करतानाच विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे.
बारामती शहरातील म.ए.सो. विद्यालयात पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतदानासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या,विरोधकांना आरोप करण्याचा अधिकार आहे पण प्रत्यक्षात तुम्ही राज्यात जाऊन पाहिले तर अशी परिस्थिती नाही.सरकार पडणार ,या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नाही. त्यामुळे विरोधक, त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहेत. त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने सरकार पडणार असे म्हणावे लागते असा टोला सुळे यांनी लगावला.
शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न संवेदनशीलपणे मांडण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. मतदानासाठी वातावरण चांगले आहे, हवाही स्वच्छ आहे. लॉकडाऊनमुळे प्रदूषण खूप कमी झाले आहे, महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यात वातावरण चांगले आहे, असे मिश्किलपणे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.वीजबिलांच्या तक्रारीसाख्या काही बाबींवर मोकळेपणाने बोलता येत नव्हते. आता आचारसंहिता संपल्यानंतर या बाबतचे धोरण आपल्याला लवकरच समजेल,असे खासदार सुळे म्हणाल्या.
————————————