माळेगाव : कारखान्याचं भलं करायचं असेल तर अजित पवारच करू शकतो असं सांगतानाच लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची हिंमत फक्त माझ्यात आहे. म्हणूनच कारखान्याची सत्ता माझ्या हातात द्यायचा निर्धार माळेगावच्या सभासदांनी करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलंच करणार असंही सांगायला ते विसरले नाहीत. माळेगाव कारखान्याचा चेअरमन आपणच होणार असल्याची घोषणा केली. पुढील पाचही वर्षात माळेगावचा राज्यातील पहिल्या पाच कारखान्यांमध्ये समावेश करून उच्चांकी उसाला दर देण्याचा निर्धार बोलून दाखवताच सभासदांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेचे स्वागत केले.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आज अजितदादांच्या हस्ते पाहुणेवाडी येथून करण्यात आला. यावेळी केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, सुनील पवार, दत्तात्रय येळे, रवींद्र माने, संजय कोकरे, दीपक तावरे, करण खलाटे, ॲड. राहुल तावरे आदी मान्यवर उपस्थित होते. अनेकजण म्हणतात मी सहकार संपवला. मला सहकार संपवायचा असता तर बारामतीतील सहकारी संस्थांना वेगवेगळ्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला असता का, असा सवालही अजितदादांनी विरोधकांना केला. विरोधक नेहमी खोटे बोलण्यात आघाडीवर असतात, माझ्यावर नेहमी बेछूट आरोप करतात, खोटे बोल पण रेटून बोल अशी त्यांची नेहमीची सवय आहे. अजितदादा कामाचा माणूस आहे हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना मी भीक घालत नाही.
बारामतीचा आमदार म्हणून मी राज्यात फिरत असतो. माळेगाव कारखान्यात मीच चेअरमन झालो तर कारखान्याचं कोणतं काम अडेल का..? मीच माझ्यासोबत ४० आमदार निवडून आणले आहेत. त्यातल्याच एकाला सहकार मंत्री बनवला आहे. त्यामुळं आपली कामे कुठेही खोळंबणार नाहीत. त्याचवेळी मी स्वतः चेअरमन असल्यानंतर कारखान्यालाही शिस्त आल्याशिवाय राहणार नाही, असेही अजितदादांनी यावेळी नमूद केले. काहीजण म्हणतात राज्यात उपमुख्यमंत्री असलेले संचालक होतायत. मी संचालक झालो म्हणून बिघडलं कुठं, मलाही संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्यामुळं जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलंच होईल. ज्या दिवशी मला वाटेल बारामतीकरांना माझ्यापेक्षा चांगला माणूस मिळाला तेव्हा मी स्वतःहून बाजूला होईल, असंही अजितदादांनी यावेळी स्पष्ट केलं.
यावेळी बोलताना त्यांनी गावोगावाच्या गटातटाच्या राजकारणावर भाष्य केलं. मी सगळ्यांना विविध संस्थांमध्ये संधी देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं आता कारखान्यात संधी मिळाली नाही म्हणून नाराज न होता तुम्हाला इतर ठिकाणी संधी मिळेल याबाबत शाश्वत राहण्याच्या सूचना केल्या. तसेच माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत कुठेही गडबड होऊ न देता पॅनल टू पॅनल मतदान करून प्रचंड मताधिक्याने नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केले.