सरकार पाडण्याची गरज नाही, तर ते आपोआपच पडेल- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 23:59 IST2020-01-08T23:58:41+5:302020-01-08T23:59:00+5:30
राज्यात विधानसभेचा २४ ऑक्टोबरला निकाल लागला, सरकार स्थापना करायला या अनैसर्गिक सरकारने एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला.

सरकार पाडण्याची गरज नाही, तर ते आपोआपच पडेल- चंद्रकांत पाटील
इंदापूर : राज्यात विधानसभेचा २४ ऑक्टोबरला निकाल लागला, सरकार स्थापना करायला या अनैसर्गिक सरकारने एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लावला, त्यातच खातेवाटप करायलाही खूप वेळ घालवला, त्यामुळे या अनैसर्गिक सरकारला पाडण्याची गरज नसून ते आपोआपच पडेल, असा आशावाद भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
इंदापूर येथे 'इंदापूर कृषी महोत्सव २०२०' चे उदघाटन बुधवार ( ८ ) रोजी दुपारी ३.३० वाजता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते - पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समितीचे सभापती पुष्पाताई रेडके, संचालक मेघ:शाम पाटील, महावीर गांधी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या सरकारने फसवी कर्जमाफी केली असून, २००१ ते २०१६ पर्यंतची २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी भाजपा सरकारने केली होती, त्यामुळे या अनैसर्गिक सरकारने 2016नंतरची अट लावून कोणाची कर्जमाफी केली ?, या सरकारला अजूनही एकर आणि हेक्टरची माहिती नाही, या सरकारची खातेवाटप, बंगलेवाटप, पदवाटप झाले महामंडळ वाटप होईल, मात्र हे शेतकऱ्यांना काहीच देऊ शकत नाहीत, असाही आरोप पाटील यांनी यावेळी केला.
यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षाने पश्चिम महाराष्ट्रातील मोठी जबाबदारी देण्याची मागणी केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही होकार देत येणाऱ्या काळात अनुभवी हर्षवर्धन पाटील यांना मोठी जबाबदारी देण्यात येईल असे सांगितले. यावेळी महोत्सवातील घोडे बाजारातील घोड्यांच्या चाळीच्या व नाचकाम स्पर्धा, तसेच प्रदर्शनात आलेले जनावरे व कृषी विषयक सखोल माहिती असलेल्या कृषीच्या स्टॉलला मान्यवरांनी भेटी दिल्या व राज्यात एक नंबरचे इंदापूरचे कृषी प्रदर्शन होण्यासाठी मदत करणार असल्याची ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांनी भाषणे केली तर माजी नगराध्यक्ष अरविंद वाघ, सामजिक कार्यकर्ते महेंद्र रेडके, युवा नेते राजवर्धन पाटील, मंगेश पाटील, मयूरसिंह पाटील, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.