म्हैसूर-उदयपूर ‘हमसफर’ला बदलते तिकीट दर नकोत; रेल्वे प्रवासी ग्रुपची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 13:14 IST2018-02-22T13:12:52+5:302018-02-22T13:14:53+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या म्हैसूर-उदयपूर या हमसफर एक्स्प्रेसला बदलत्या तिकीटदरांचा नियम लागू करू नये, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी केली आहे.

म्हैसूर-उदयपूर ‘हमसफर’ला बदलते तिकीट दर नकोत; रेल्वे प्रवासी ग्रुपची मागणी
पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या म्हैसूर-उदयपूर या हमसफर एक्स्प्रेसला बदलत्या तिकीटदरांचा नियम लागू करू नये, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा यांनी केली आहे.
रेल्वेने साप्ताहिक हमसफर एक्स्प्रेस सुरू केली असून ती उदयपूरहून (१९६६७) दर सोमवारी रात्री २१ वाजता निघून मंगळवारी सायंकाळी १६़५५ वाजता पुण्यात पोहोचेल व बुधवारी सायंकाळी १६़२५ वाजता म्हैसूर येथे पोहोचणार आहे़ ही गाडी २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे़ म्हैसूरहून (१९६६८) ही गाडी दर गुरुवारी सकाळी १० वाजता निघेल व शुक्रवारी सकाळी ८़२० वाजता पुण्यात पोहोचून पुढे शनिवारी पहाटे ४़५५ वाजता उदयपूरला पोहचणार आहे़ ही गाडी चितोडगड, रतलाम, बडोदा, सुरत, वसई रोड, पुणे, बेळगाव, हुबळी, दावणगिरी, बंगळुरु सिटी, मंड्या मार्गे जाणार आहे़ हर्षा शहा यांनी सांगितले की, पुण्यातील भाविकांना राजस्थानमधील तसेच दक्षिणेतील धार्मिक स्थळांना भेटी देणे सोयीचे होणार आहे़ तसेच, राजस्थान व दक्षिणेतील लोकांना पर्यटनासाठी ही गाडी सोयीस्कर ठरणार आहे़ मात्र, रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या आरक्षणासाठी बदलत्या तिकीटदरांची प्रणाली लागू केली आहे़