पुणे :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख साईनाथ बाबर व उद्धवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे शनिवारी दुपारी मनसेच्या पक्ष कार्यालयात एकत्र आले. हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात मुंबईतील ५ जुलैला निघणाऱ्या मोर्चासाठी पुण्यातून करायच्या नियोजनासंबंधी त्यांनी एकत्रित चर्चा केली. शहराच्या राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला.
दोघांनीही आपापल्या नेत्यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला व त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला टीकेचे लक्ष्य केले. आमच्या एकत्र येण्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कसलेही काम न करता केवळ पक्षांची फोडाफोटी, सरकारी यंत्रणाचा गैरवापर, भ्रष्टाचारी नेत्यांना पक्ष प्रवेश असे कोणतेही नीतिमूल्य नसलेले राजकारण करण्यासाठीच भाजप प्रसिद्ध आहे. दिल्लीतील सरकार तेच करते आहे व राज्यातील सरकारही त्याचीच री ओढत आहे, अशी टीका मोरे व बाबर यांनी केली.
ही युती पुढे राहील का?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्रच लढवल्या जातील का? हा पुढचा विषय आहे. आता आमच्यासाठी महत्त्वाचा विषय मुंबईतील मोर्चाचे नियोजन हाच आहे, त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. हा मोर्चा यशस्वी होणार यात शंका नाही, मात्र तो अधिक यशस्वी व्हावा, अविस्मरणीय व्हावा, त्यात पुणे शहर जिल्ह्याचे योगदान असावे, असा आमचा प्रयत्न आहे. आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे मोरे व बाबर यांनी सांगितले.