Maratha Reservation : बेमुदत चक्री उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:45 IST2018-08-21T00:45:09+5:302018-08-21T00:45:31+5:30
मराठा आरक्षणासाठी आचारसंहिता; आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन

Maratha Reservation : बेमुदत चक्री उपोषण सुरू
पुणे : मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षण लागू करावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या सूत्रधारास शोधून काढावे यांसह विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर (कौन्सिल हॉल) सोमवारपासून (दि. २०) बेमुदत चक्री उपोषणाला सुरुवात करण्यात आली. नुकत्याच झालेल्या काही आंदोलनांना हिंसेचे गालबोट लागल्याने आंदोलनकर्त्यांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. तिचे पालन करण्याचे आवाहन आंदोलकांकडून करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांकडून आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. त्यानुसार दररोज वेगवेगळा गट उपोषणात सहभागी होणार आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आंदोलक आंदोलन करतील. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह आंदोलकांनी विविध मागण्या जाहीर केल्या आहेत.
आंदोलनाच्या काळात आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, त्यांना सरकारी नोकरी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया आर्थिकदृष्ट्या मागास श्रेणी नियमात बदल करावा, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधावे, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक नियमातील तरतुदींचा गैरवापर थांबवावा व त्यात दुरुस्ती करावी, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मराठा समाजातील अधिकाºयांवर पदोन्नतीत
होणारा अन्याय थांबवावा अशा विविध १५ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
मराठा समाजातर्फे गेली दोन वर्षे शांततेच्या मार्गाने व अहिंसक पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. काही घटकांकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही महिन्यांतील घटनांवरून ते स्पष्ट होत आहे. या आंदोलनात बाह्य शक्तींचा हात असल्याचे समोर आले आहे. त्याचा सूत्रधार कोण, याचा शोध सरकारने घ्यावा.
अशी असेल आचारसंहिता...
आंदोलन शांततेने व शिस्तीने करावे, आंदोलनाला गालबोट लागेल, असे कृत्य करू नये
प्रक्षोभक व भडकावू घोषणा व भाषण करू नये
आंदोलनात कोणता पक्ष अथवा संघटना म्हणून नव्हे, तर मराठा म्हणून सहभागी होणार
आंदोलनादरम्यान झालेला कचरा, रिकाम्या बाटल्या कचरा पेटीत टाकणार
आंदोलनात शांततेने सहभागी होणार आणि शांततेत घरी जाणार
आंदोलनात अनुचित प्रकार करणाºयाला रोखणार आणि पोलिसांच्या ताब्यात देणार