मराठा बांधव करणार सरकारचा दशक्रिया विधी; आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
By विश्वास मोरे | Updated: October 30, 2023 16:49 IST2023-10-30T16:47:13+5:302023-10-30T16:49:09+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने प्रश्न सोडवण्यासाठी ३० दिवसाची वेळ घेतली होती....

मराठा बांधव करणार सरकारचा दशक्रिया विधी; आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
पिंपरी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी बांधव आक्रमक झाले आहेत. मंगळवार, दिनांक ३१ ऑक्टोंबरला सकाळी ११ वाजता मोरया गोसावी दशक्रिया विधी घाट चिंचवड येथे होणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारने प्रश्न सोडवण्यासाठी ३० दिवसाची वेळ घेतली होती. आज ४७ दिवस झाले तरी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. गेल्या सहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. याबाबत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्यास काही झाले तर समाज गप्प बसणार नाही आणि सरकारला हे आंदोलन परवडणार देखील नाही.
पुढे ते म्हणाले, सध्या राज्यात दररोज पाच ते सहा मराठा बांधव आत्महत्या करत आहेत तरीही या मृत पावलेल्या शासनाला जाग येत नाही. या शासनाला जागं करण्यासाठी मुर्दाड निष्क्रिय शासनाचा निषेध म्हणून दशक्रिया ( दहावा ) करुन निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. हे आंदोलन मंगळवारी सकाळी अकरा वाजता मोरया गोसावी दशक्रिया विधी घाट चिंचवड येथे होणार आहे.