Maharashtra Election 2019 : "तेव्हा मुस्लीम मते मिळाली नव्हती; कोण कुणाची ‘बी टीम’ हे जनता जाणते"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 04:50 AM2019-10-09T04:50:01+5:302019-10-09T04:50:29+5:30

'जितके मुस्लिम समाजाचे मतदान आहे, तेवढे सगळे आम्हाला मिळालेले नाही'

Maharashtra Election 2019: "No Muslim votes were received at that time; who knows whose 'B team'?" | Maharashtra Election 2019 : "तेव्हा मुस्लीम मते मिळाली नव्हती; कोण कुणाची ‘बी टीम’ हे जनता जाणते"

Maharashtra Election 2019 : "तेव्हा मुस्लीम मते मिळाली नव्हती; कोण कुणाची ‘बी टीम’ हे जनता जाणते"

googlenewsNext

- धनाजी कांबळे

पुणे : वंचित बहुजन आघाडीबाबत आता सगळेच राजकीय पक्ष बोलायला लागले आहेत. याचा अर्थ असा होतो, की प्रस्थापितांच्या गडांना धक्का देण्याची ताकद वंचितमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम मते मिळाली नाहीत. ती यावेळी मिळतील. त्यामुळे विरोधीपक्षनेता नव्हे, तर वंचित आघाडीच सत्तेवर येईल, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

वंचित बहुजन आघाडीसोबत आता एमआयएम नाही, त्याचा काय परिणाम होईल?
- लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला जनतेने चांगला प्रतिसाद दिला आहे. तब्बल ४१ लाख मते मिळाली आहेत. यात एमआयएमचाही काही प्रमाणात वाटा आहे. मात्र, जितके मुस्लिम समाजाचे मतदान आहे, तेवढे सगळे आम्हाला मिळालेले नाही. आता मौलवींनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे मुस्लिम समाजाचीही मते मिळतील.

वंचित आघाडीला भाजपची बी टीम म्हटले जाते, त्याचे काय?
- आज कोण कोणत्या पक्षातून कुठे गेलेत, हे सर्वश्रुत आहे. जे त्यांच्या पक्षांचे मूळचे निष्ठावान होते, त्यांना डावलून जे आयाराम आहेत त्यांना तिकीटे दिली आहेत. त्यामुळे कोण कुणाची बी टीम की ए टीम आहे, हे महाराष्ट्रातील सुज्ञ जनता जाणते.

वंचितने सर्व समूहांना उमेदवारी दिली आहे, हे सोशल इंजिनिअरिंग कितपत यशस्वी होईल?
- प्रस्थापितांना धडकी भरावी एवढी ताकद निश्चितपणे वंचितमध्ये आलेली आहे. आम्ही केवळ घोषणाबाजी करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो नाही. तर आम्ही एक ठोस असे व्हीजन घेऊन दृष्टीकोन घेऊन मैदानात आहोत. जनतेच्या कल्याणाचा मार्ग काय असू शकतो, हे आमच्याच पक्षाने दाखवून दिले आहे. तसा जाहीरनामा आम्ही मांडला आहे. आरएसएसच्या विचारसरणीनुसार चाललेल्या सरकारला ही परिस्थिती अशीच राहावी, असं वाटतं. बलुतेदार, आलुतेदार अशा सर्वच दुर्लक्षित घटकांना आम्ही उमेदवारी दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, वंचितचा विरोधीपक्ष नेता असेल, खरे काय?
- कुणी काय बोलावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न. परंतु, आमची ताकद वाढली आहे, हे यावरून दिसते. त्यामुळे आमची भीती वाटत असल्यानेच ते असे बोलत असावेत. वंचितचा विरोधीपक्षनेता नव्हे, तर सरकार स्थापन करण्याचा आमचा दावा आहे.

कोणते मुद्दे घेऊन तुमचा पक्ष मतदारांपुढे जात आहे?
- अच्छे दिनचे स्वप्न दाखवून ते सत्तेवर आले. पण आज हजारो कंपन्या बंद पडल्या आहेत. नोटाबंदी, जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद केले आहेत. अ‍ॅटो सेक्टर, रिअल इस्टेटमध्ये मंदी आली आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत हे मुद्दे आहेत. आमच्याकडे रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम आहे. आशा कर्मचारी, अगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांचे प्रश्न प्रलबित आहेत. पोलिसांची ड्युटी आजही निश्चित वेळेची नाही. ती केवळ कागदावरच आहे. त्यांच्यासाठी ८ तासांची ड्युटी करायची आहे. शेतीपूरक उद्योगांना चालना दिली जाईल. सहकारी बँकांची पुनर्रचना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचे आमचे धोरण आहे. खरं तर बाबासाहेबांनी जे विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, ते सत्यात आणण्यासाठी आम्ही सत्ता मागत आहोत.

राज्यात ४३ लाख बोगस मतदार
राज्यात ४३ लाख बोगस मतदार असल्याचे समोर आले आहे. सत्ताधारी पक्ष निवडून येण्यासाठी ईव्हीएमबरोबरच बोगस मतदारांवर लक्ष ठेऊन आहे. प्रत्येक मतदाराला एक इपिक नंबर असतो, तो नंबर दुसºया कोणत्याही मतदाराला नसतो, असे असतानाही राज्यात बोगस मतदार तयार करण्यात आले आहेत. त्याची नोंदणीही झाली आहे. प्रशासकीय अधिकारी देखील यात सहभागी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, यामुळे निश्चितपणे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो.

Web Title: Maharashtra Election 2019: "No Muslim votes were received at that time; who knows whose 'B team'?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.