G20 Summit In India: 'जी-२०' परिषदेची एक बैठक पुण्यात होणार, २० देशांचे तब्बल ३०० मंत्री येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 23:12 IST2022-03-16T23:11:18+5:302022-03-16T23:12:39+5:30
भारत देशाने जगातील विविध विकसित देशांचा सहभाग असलेल्या ‘जी-२०’ परिषदेचे यजमान पद यंदा स्वीकारले असून, पुण्यात या परिषदेची एक बैठक होणार आहे.

G20 Summit In India: 'जी-२०' परिषदेची एक बैठक पुण्यात होणार, २० देशांचे तब्बल ३०० मंत्री येणार!
पुणे :
भारत देशाने जगातील विविध विकसित देशांचा सहभाग असलेल्या ‘जी-२०’ परिषदेचे यजमान पद यंदा स्वीकारले असून, पुण्यात या परिषदेची एक बैठक होणार आहे. यावेळी परदेशी पाहुणे पुण्यात दाखल होणार असून, पुण्यातील इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती ते जाणून घेणार आहेत.
डिसेंबर , २०२२ पासून सुरू होणाऱ्या व भारतात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेच्या विविध बैठका पैकी, महाराष्ट्र राज्यात मुंबई व पुणे येथे प्रत्येकी एक बैठक घेतली जाणार आहे. यानुसार केंद्र सरकारच्या पथकाने बुधवारी पुणे भेटीत या मंत्र्यांसाठी राहण्याची व्यवस्था, त्यांची वाहन, सुरक्षा व्यवस्था तसेच संभाव्य कार्यक्रमांच्या अनुषंगाने चाचपणी केली आहे.
‘जी-२०’ परिषदेच्या निमित्ताने पुण्यात या २० देशांतील ३०० मंत्री दाखल होणार असून ते पुण्यातील इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती जाणून घेणार आहेत. याकरिता केंद्र सरकारचे पथक आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेत या परिषदेच्या नियोजन विषयक चर्चा केली.
‘भारताला २०२२ साली स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं पूर्ण होणार आहेत. भारत देश जगात सगळ्यांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून येथे येऊन भारताचा समृद्ध इतिहास आणि वैविध्यपूर्ण संस्कृती जाणून घ्या आणि भारताच्या पाहुणचाराचाही आस्वाद घ्या,’ असे मोदींनी ट्विटद्वारे आवाहन केले होते. त्यानुसार केंद्र सरकारच्या पथकानेही पुण्यातील कार्यक्रमांची आखणी करताना ऐतिहासिक स्थळांची आवर्जुन माहिती घेतली आहे. यावेळी ‘जी-२०’ गटातील शक्तीशाली २० देशांच्या ३०० मंत्र्यांचे पुणे सफर होणार आहे. यावेळी आलेल्या पाहुण्यांना पुण्यातील संस्कृती व ऐतिहासिक वारसा दाखवितानाच, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज आलेल्या केंद्रीय पथकाने सर्व पाहणी केली. यात आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था करण्यासाठी व्ही व्हीआयपी गाड्या यांची व्यवस्था करण्याबाबत स्थानिक यंत्रणेला सूचित केले आहे.
डिसेंबर २०२२ पासून ही परिषद होणार असली तरी याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आल्याने, या परिषदेच्या माध्यमातून पुण्याच्या नावलौकिकात आणखी एक मनाचा तुरा बसणार आहे.