ठोस कारवाई न झाल्यास सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 02:50 IST2018-12-09T02:50:33+5:302018-12-09T02:50:44+5:30

येत्या काळात येथील पाणीप्रश्नासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला या बैठकीस पाबळ केंदूर परिसरातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

If no concrete action is taken, then the villagers will be given a cabinet ban | ठोस कारवाई न झाल्यास सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी

ठोस कारवाई न झाल्यास सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी

शिक्रापूर : पाबळ, ता. शिरूर व परिसरातील गावातील पाणी प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. गेली अनेक वर्षे या भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागावा, यासाठी मागणी होत असून यासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व आमदार दिलीप वळसे पाटील यांना मुदतबंद कार्यक्रम दिला जाईल, यावर ठोस कारवाई न झाल्यास सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात येईल, असा इशारा पाबळ येथे झालेल्या बैठकीमध्ये देण्यात आला. त्याचबरोबर येत्या काळात येथील पाणीप्रश्नासाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला या बैठकीस पाबळ केंदूर परिसरातील ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पाबळचे माजी सरपंच सोपान जाधव यांनी सांगितले की सर्व गावातील ग्रामस्थांनी एकजुट राखायला हवी, पाणी प्रश्नापुढे कुठलाही प्रश्न आम्हाला महत्त्वाचा नसून मी शिवसेना विभागप्रमुख असलो तरी मला गावाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवण्याची मागणी जाधव यांनी केली.

यावेळी खेड तालुक्यातील वरुडे, पूरगाव ,कनेरसर, शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ, धामारी, खैरेनगर, कान्हूर मेसाई तसेच आंबेगाव तालुक्यातील धामणी, लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी या सर्व गावात पाणी प्रश्नाविषयी जनजागृती करून प्रशासनाला पाणी प्रश्न सोडवण्यात भाग पाडण्यासाठी आंदोलनाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी पाबळच्या सरपंच रोहिणी जाधव उपसरपंच संजय चौधरी, केंदूरचे माजी उपसरपंच युवराज साकोरे, भरत साकोरे, भाऊसाहेब थिटे, ग्रामपंचायत सदस्य पल्लवी डहाळे, नामदेव जगताप, सुलभा पिंगळे, कल्याणी साकोरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केंदूर येथील ग्रामपंचायत सदस्य भरत साकोरे यांनी सांगितले थिटेवाडी बंधाऱ्यात पावसाच्या पाण्याशिवाय पाणी येत नाही ते आले तर काही गावांचा विकास होणार आहे, त्यामुळे राजकीय वाद बाजूला ठेवून कायमस्वरूपी पाणी प्रश्नावर एकत्र येत आम्ही सर्व एकत्र येत आहोत.

तीव्र आंदोलन उभारण्याची तयारी
येत्या काळात पाण्यासाठी तीव्र आंदोलन उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. नुकत्याच केंदूर येथे झालेल्या बैठकीत ‘पुढाºयांना गावबंदी’ पाणी प्रश्न सुटत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यानंतर पाबळ येथे झालेल्या बैठकीत पुन्हा हा मुद्दा उपस्थित झाल्याने येत्या काळात या भागातील पाणीप्रश्न चांगलाच पेटणार असल्याची चिन्ह आहे.
पाबळसह परिसरातील १२ गावांतील दुष्काळी परिसरातील प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट, शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार सुरेश गोरे, भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णे या सर्वांना एकत्र येण्यास भाग पाडून आम्हाला फक्त पाणी हवे कारण नको, अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली.
त्याचबरोबर दुष्काळी गावातील ग्रामसभेचे ठराव घेऊन ते ठराव या नेत्यांना देऊन त्यांना एका महिन्याची मुदत देऊन पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास मतदानावर बहिष्काराबरोबर इतर मार्गांनी आंदोलन तीव्र करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.

Web Title: If no concrete action is taken, then the villagers will be given a cabinet ban