पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध झाला आहे. अक्षय तृतीया चारच दिवस उरल्यामुळे बुधवारी (दि. ३०) आहे. यामुळे मार्केटयार्ड फळ बाजारात पणन मंडळ व वखार महामंडळ आधी भागात राज्य पणन महामंडळाच्या वतीने शेतकऱ्यांचा थेट माल ग्राहकापर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध केल्याने मार्केटयार्ड परिसरात आंबा खरेदीसाठी ग्राहकाकडून गर्दी होत आहे. बाजारात आंब्याची आवक ही वाढल्याने दरही सामान्यांच्या आवाक्यात आहेत. बाजारात ४०० रुपयांपासून ते ८०० रुपये डझनापर्यंतचा आंबा उपलब्ध आहे.
तयार मालाचे दर
५ ते ९ डझनाच्या पेटीला २५०० ते ४५०० रुपये, तर कच्चा मालाच्या पाच ते नऊ डझनाच्या पेटीला १५०० ते ३५०० दर मिळत आहे. डझनाचा दर ४०० ते ८०० रुपये आहे. मार्केटयार्डातील फळ बाजारात रोज चार ते पाच हजार पेटींची आवक होत आहे. मागीलवर्षी याच काळात रोज ७ ते ७.५ हजार पेटींची आवक होत होती. एका डझनाचा दर २५० ते ६०० रुपये होता. चार ते आठ डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीचा दर १००० ते २८०० रुपये होता.
बाजारातील हापूसचा दर
आंबा डझन दरहापूस (तयार) ५ ते ९ २५०० ते ४५००हापूस (कच्च) ५ ते ९ १५०० ते ३५००हापूस (तयार) १ डझन ४०० ते ८००
हापूसचा हंगाम १५ मे पर्यंत
सद्य:स्थितीत बाजारात चांगल्या प्रतीचा हापूस आंबा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. त्यामुळे ग्राहकांना अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूसची चव चाखता येणार आहे. यंदा कोकणात झाडांना फळे कमी लागली असल्याने शेतकऱ्यांच्या अंदाजानुसार हंगाम १५ मे पर्यंत संपेल. त्यामुळे हापूसची चव चाखण्यासाठी हा काळ उत्तम आहे.
अक्षय तृतीयाला दरात वाढ होणार नाही. दरवर्षी सुमारे १५ जूनच्या दरम्यान हापूसचा हंगाम संपत असतो. यंदा आंबा कमी आणि अधिकच्या उष्णतेमुळे तो लवकर तयार होत आहे. त्यामुळे १५ मे नंतर हंगाम संपणार असल्याचा अंदाज आहे. - अरविंद मोरे, व्यापारी, मार्केटयार्ड.