टेकडीवर प्लास्टिक टाकल्यास ५०० रूपये दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:09 IST2020-12-25T04:09:41+5:302020-12-25T04:09:41+5:30
पुणे : म्हातोबा टेकडीवर गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्या उचलण्याचे काम काही नागरिक व लहान मुले करीत आहेत. या ...

टेकडीवर प्लास्टिक टाकल्यास ५०० रूपये दंड
पुणे : म्हातोबा टेकडीवर गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक पिशव्या उचलण्याचे काम काही नागरिक व लहान मुले करीत आहेत. या पिशव्यांमुळे टेकडीवरील जैवविविधता नष्ट होत आहे. त्यामुळे टेकडीवर या पिशव्यांची बंदी करून जो कोणी ते टाकेल, त्यांना ५०० रूपये दंड करण्याचा विचार वन विभाग करत आहे. तसेच यासंबंधीचे फलकही लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
प्लास्टिक पिशव्या टेकडीवर पडल्याने त्या मातीत जाऊन ती खराब करत आहेत. त्या नष्ट होत नसल्याने तशाच पडून राहतात. म्हणून स्थानिक नागरिक आभा भागवत त्यांचा मुलगा तुहिन, ओजस हे येथील प्लास्टिक पिशव्या जमा करत आहेत. त्यांनी आतापर्यंत कितीतरी किलो प्लास्टिक संकलित केले आहे. याबाबत त्यांनी वन्यजीव मंडळाचे मानद सदस्य अनुज खरे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मग वन विभागाशी संपर्क साधून याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
या विषयी वन परीक्षेत्र अधिकारी दीपक म्हणाले,‘‘टेकडीवर प्लास्टिक पिशव्या टाकू नये म्हणून आम्ही ५०० रूपये दंड करण्याचा विचार करत आहोत. तसेचही प्लास्टिकवर बंदीच आहे. त्यामुळे टेकडीवरही कोणी प्लास्टिक टाकताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या विषयी टेकडीवर फलक लावण्याचाही विचार आहे.’’
टेकडीवर अनेक नागरिक प्लास्टिक पिशव्या टाकतात. त्या आम्ही संकलित करून संबंधित यंत्रणेला देत आहोत. आताही आम्ही प्लास्टिकच्या जाळ्या जमा केल्या आहेत. त्या खूप जास्त असून, वन विभागाकडून त्या हलविण्यात येणार आहेत. हे प्लास्टिक मातीत रूतत असल्याने येथील मातीही खराब होत आहे.
- आभा भागवत, स्थानिक नागरिक