पुणे : वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे ई-चलनाद्वारे एकाला आकारलेली दंडाची पावती दुसऱ्याच्या मोबाईलवर आल्याने वाहतुकीचे सर्व नियम पाळणाऱ्या एका नागरिकाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला. दंड आकारणीमध्ये सुलभता यावी, यासाठी सुरु करण्यात आलेली ई-चलन प्रणाली वाहतूक पोलिसांच्या चुकीमुळे सर्वसामान्यांसाठी त्रासदायक ठरू लागल्याचे चित्र आहे.नऱ्हे येथे राहणारे सुरेश पिंगळे (वय ५४, रा. मानाजीनगर, नऱ्हे ) यांच्या मोबाइलवर २२ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे वाहतूक पोलिसांचे ई-चलन प्राप्त झाले. रात्री साडेदहाच्या सुमारास गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्याने दोनशे रुपयांची दंड भरण्याबाबतचे त्यात नमूद होते. ही दंडाची पावती पाहून या नागरिकाला धक्काच बसला. आपले वाहन आपल्या सोसायटीच्या वाहनतळात उभे असताना आपण बाहेर गेलोच कधी, असा प्रश्न त्यांना पडला. अखेर पावतीसोबत पाठवलेल्या वाहनाचे छायाचित्र पाहिले असता हे वाहन आपले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. छायाचित्रातील वाहनाचा क्रमांक वेगळा होता. त्यानंतर पोलिसांकडून झालेल्या चुकीचा उलगडा त्यांना झाला. वाहतूक पोलिसांच्या या प्रतापाबद्दल त्यांनी १०० नंबरला फोन करून कळविण्याचा प्रयत्न केला असता फोन लागला नसल्याचे त्यांनी सांगितले.
गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 16:33 IST
आपले वाहन आपल्या सोसायटीच्या वाहनतळात उभे असताना आपण बाहेर गेलोच कधी, असा प्रश्न त्यांना पडला.
गुन्हा एकाचा अन् दंडाची पावती दुसऱ्याला : वाहतूक पोलिसाच्या चुकीचा फटका
ठळक मुद्देवाहतूक पोलिसाच्या चुकीमुळे नियम पाळणाऱ्या नागरिकालाच झाला दंड