‘मी गातो माझे गाणे’मधून रंगली स्वरमैफल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST2021-02-05T05:16:35+5:302021-02-05T05:16:35+5:30
पुणे : स्त्रीभ्रूणहत्येच्या विषयात जनमानसात सकारात्मकता निर्माण करण्यापासून स्वत:मधील सामर्थ्य ओळखण्यापर्यंतचा प्रवास गीतांद्वारे रसिकांसमोर उलगडण्यात आला. एक शायर जन्माला ...

‘मी गातो माझे गाणे’मधून रंगली स्वरमैफल
पुणे : स्त्रीभ्रूणहत्येच्या विषयात जनमानसात सकारात्मकता निर्माण करण्यापासून स्वत:मधील सामर्थ्य ओळखण्यापर्यंतचा प्रवास गीतांद्वारे रसिकांसमोर उलगडण्यात आला. एक शायर जन्माला येण्यासाठी काय लागते, हे सांगणारे वैशिष्ट्यपूर्ण गीत सादर झाले. त्यात शब्द आणि त्याच्या अर्थामधील वैविध्य पुणेकरांनी अनोख्या अशा आरव, पुणे निर्मित ‘मी गातो माझे गाणे’ या स्वरमैफलीतून अनुभवले.
युवा संगीतकार निखिल महामुनी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि डॉ. माधुरी चव्हाण-जोशी यांनी लिहिलेली गीते या वेळी सादर झाली. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात निखिल महामुनी, ॠचा महामुनी, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी यांनी सादरीकरण केले. तर अनिल आठलेकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
मैफलीची सुरुवात निखिल महामुनी यांनी 'मी गातो माझे गाणे' या कवितांच्या रचनांचा कार्यक्रम असलेल्या प्रमुख गीताने केली. 'बाभळीची देहजाळी चंदनाला सांगते' ही रचना उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरली.
स्त्री-भ्रूणहत्येसारखा विषय गीतातून मांडताना केवळ व्यथा नको, तर त्यातील सकारात्मकता मांडू, या उद्देशाने ॠचा महामुनी हिने सादर केलेले 'काळीज का हो...' या गीताला रसिकांची उत्तम दाद मिळाली. 'कहाण्या काही उशाला' आणि 'गोठलेल्या काळजाच्या पार झाली पाहिजे' या गीतांच्या सादरीकरणाच्या वेळी रसिकांनी ताल धरला. स्वरमैफलीचा समारोप काव्य कृष्ण सुदामा या रचनेने झाला. मैफलीपूर्वी डॉ.माधुरी चव्हाण-जोशी यांच्या 'मधुघट' या पहिल्या गझलसंग्रहाचे प्रकाशन देखील झाले.