Baramati bypoll Election: काँग्रेस माघार घेणार ? आकाश मोरेंनी स्पष्टच सांगितलं,पक्षाकडून जो आदेश येईल..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:25 IST2026-04-09T13:24:45+5:302026-04-09T13:25:38+5:30
Baramati bypoll Election : लोकांकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या भावना जपणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याबाबत मी वरिष्ठांना अवगत केले आहे.

Baramati bypoll Election: काँग्रेस माघार घेणार ? आकाश मोरेंनी स्पष्टच सांगितलं,पक्षाकडून जो आदेश येईल..
बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण करण्यात आली असून त्यापैकी ५३ अर्ज वैध ठरले आहेत. यापैकी ६ उमेदवारांनी बुधवारी (दि. ८) आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता एकूण ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. आज बारामतीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या निर्णयाचे पालन करण्याची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,पक्षाकडून जो आदेश येईल, तो मला मान्य असेल. अद्यापपर्यंत मला कोणताही अधिकृत आदेश मिळालेला नाही. हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून जो काही निर्णय कळवण्यात येईल, तो मी स्वीकारेन.
माध्यमांशी बोलतांना मोरे पुढे म्हणाले, मी हर्षवर्धन सपकाळ यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते पक्षाचे प्रमुख असून वडेट्टीवार यांचेही नेतृत्व करतात. त्यामुळे ते जो निर्णय देतील, तो मला मान्य असेल. आतापर्यंत पक्षाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळालेल्या नाहीत.
रोहित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी सकारात्मक संवाद झाल्याचा विश्वास व्यक्त केला. लोकांकडून मला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या भावना जपणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्याबाबत मी वरिष्ठांना अवगत केले आहे. असेही त्यांनी नमूद केले. मला निवडणूक लढवावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. बारामतीसारख्या ठिकाणी भूमिका घेण्याची संधी मिळाल्याने मी आनंदी आहे. येथील प्रलंबित प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे, असे ते म्हणाले.
पक्षाच्या संभाव्य निर्णयाबाबत बोलताना मोरे म्हणाले, वरिष्ठांचा फोन आल्यानंतरच अंतिम निर्णय घेईन. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. सपकाळ यांनीही काहीही निर्णय झाला तरी मी तुझ्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभा राहीन असे आश्वासन दिले आहे.
शरद पवार यांच्या पक्षाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष वेगळा आहे. अद्याप कोणतीही सूचना मिळालेली नसल्याने मी सध्या माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. पक्ष जो निर्णय घेईल, त्या नियमांना मी बांधील राहीन. तसेच, मकरंद पाटील यांच्या जिल्ह्यातील आणि तालुक्यातील राजकीय परिस्थिती पाहता ते उमेदवारी मागे घेण्याचा सल्ला देणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.