पुणे : श्री संत ज्ञानेश्वर माउली आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी दुपारी पुण्यात दाखल झाला. भक्तिरसात न्हालेल्या वारीने पुण्यनगरी हरिनामाने दुमदुमली. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पंढरपूर दर्शनाच्या उत्साहाची झलक तर त्यांचे दर्शन झाल्याचा आनंद पुणेकरांच्या चेहऱ्यावर झळकत होता. काही वारकरी टाळ-मृदंग वाजवत, फेर-फुगड्या खेळत, जयघोष करीत आनंदाने नाचत होते.
वारीचा आनंद सोहळा याचि देही, याचि डोळा अनुभवण्यासाठी पुणेकर वारी मार्गावर सकाळपासून आस लावून बसला होता. दुपारच्या वारी पुण्यनगरीत दाखल झाली आणि फुलांच्या वर्षावात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. प्रत्येक वारकरी समाधानी आणि आनंदी दिसत होता. कारण यंदा वरुणराजाने चांगलीच कृपा केली होती.
भले काही ठिकाणी पेरण्या रखडलेल्या असल्या तरी पाऊस आल्याचा आनंद वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. कित्येक वर्षांपासून वारी करणाऱ्यांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. तेव्हा वारी ही वर्षभराच्या आनंदाची, उत्साहाची शिदोरीच असल्याचे अनेकांनी सांगितले. वारीचा आनंद निखळ, निरागस असतो. तो मिळवण्यासाठीच आम्ही या वारी सोहळ्यात दाखल होतो, अशा भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. लहान-थोर सर्वजण नटूनथटून वारीचे स्वागत करायला संचेती चौकात आले होते. वारीचा हा आनंद सोहळा आता पुण्यात मुक्कामी असणार आहे. त्यामुळे पुणेकर वारकऱ्यांची सेवा करण्यात दंग राहतील.
उद्या एक दिवस मुक्काम
पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उद्या मुक्कामी असते. नागरिकांना पालखीचे दर्शन घेण्यासाठी पूर्ण एक दिवस मिळतो. रविवारी सकाळी माऊली सासवडच्या दिशेने तर संत तुकाराम लोणी काळभोरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत.