- भानुदास पऱ्हाडआळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने अंकली (ता. चिकोडी) येथून सुमारे ३०० कि.मी.चा प्रवास पूर्ण करत माउलींचे मानाचे दोन्ही अश्व आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत दाखल झाल्यानंतर दोन्ही अश्वांचे विधिवत पूजन करण्यात करून मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केली.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासमोर दोन अश्व असतात. हे दोन्ही अश्व अंकली (ता. चिकोडी, कर्नाटक) येथून दरवर्षी येत असतात. यंदा ८ जूनला या दोन्ही अश्वांनी आळंदीकडे पायी प्रस्थान केले होते. सुमारे तीनशे कि.मी.चा पायी प्रवास अश्वांनी पूर्ण केला. माउलीच्या पालखी सोहळ्याचे आज (दि. १९) आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हैबतबाबांनी १८३२ साली सुरू केला. तेव्हापासून शितोळे सरकारांचे अश्व या सोहळ्यासाठी असतात. रथापुढे चालत असतो तो माउलीचा अश्व व दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार झालेला असतो, तो स्वाराचा अश्व असे एकूण दोन अश्व या सोहळ्यात सहभागी आहेत.
माउलींच्या रिंगण सोहळ्यात हे दोन्ही अश्व वारकऱ्यांसाठी मुख्य आकर्षण असते. वारकरी या अश्वांच्या पायांखालील माती आपल्या मस्तकावर लावून स्वतःला धन्य करून घेत असतो. दरम्यान, आळंदीच्या वेशीवर अश्वांचे परंपरेप्रमाणे सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर (पवार) आणि आळंदी देवस्थानच्या वतीने पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे, प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, विश्वस्त कबीरबुवा लोंढे, माउलींचे मानकरी आणि आळंदीकर ग्रामस्थांनी स्वागत केले. तद्नंतर माउलींच्या समाधीचे दर्शन घेऊन दोन्ही अश्व फूलवाले धर्मशाळा येथे मुक्कामी नेण्यात आले.
१८३२ सालापासून परंपरा कायम
हैबतबाबांनी १८३२ साली माउलींचा सोहळा स्वतंत्रपणे सुरू केला. तेव्हापासून शितोळे सरकारांनी या सोहळ्यास राजाश्रय दिला. त्यानुसार रोज शितोळे सरकारांच्या तंबूत माउलींच्या पादुकांचा मुक्काम, नैवेद्य, समाजआरतीस स्वतः किंवा प्रतिनिधींची उपस्थिती, वारीतील न्यायनिवाडा शितोळे सरकारांच्या ध्वजाखाली होणे हे रीतिरिवाज कायम आहेत. सोहळ्यात रोज पहाटे चार वाजता चोपदार अश्वास निमंत्रण देतात. त्यानंतर साडेपाच वाजता हा अश्व दर्शनासाठी माउलींच्या पादुकाजवळ येतो. त्यावेळी त्याच्या गळ्यात पुष्पहार घातला जातो. तेथून तो पुढे चालण्यास मार्गस्थ होतो. सोहळ्यात व इतर वेळी कधीही माउलीच्या अश्वावर कोणीही बसत नाही, अशी माहिती श्रीमंत सरदार ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार (अंकलीकर) यांनी दिली.