अमित देशमुख म्हणतात, 'हे सरकार पाच वर्षे नक्की टिकेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 14:58 IST2020-01-10T14:31:06+5:302020-01-10T14:58:15+5:30

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित‘पिफ’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर पुण्यातील त्यांचा पहिला कार्यक्रम होता.

Amit Deshmukh says, 'This government will complete five years' | अमित देशमुख म्हणतात, 'हे सरकार पाच वर्षे नक्की टिकेल'

अमित देशमुख म्हणतात, 'हे सरकार पाच वर्षे नक्की टिकेल'

पुणे : कला, संस्कृती, नाट्य, संगीत यांची जोपासना करण्याबरोबरच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात शासन कटिबद्ध आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणि सांस्कृतिक खात्याकडून विविध प्रश्नांना गती देण्याचे काम नक्कीच केले जाईल, अशी ग्वाही देत राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी देत हे सरकार पाच वर्षे नक्की टिकेल. याबद्दल कुणीही मनात शंका आणू नये, असा विश्वासही दिला.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित‘पिफ’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर पुण्यातील त्यांचा पहिला कार्यक्रम होता.

पुढे ते म्हणाले की, 'महाराष्ट्रात निवडणूका झाल्या आणि निवडणुकीनंतर बरेच काही घडले. माझ्या आयुष्यात असा योग इतक्या लवकर येईल असे वाटले नव्हते; पण एक सांस्कृतिक मंत्री या नात्याने माझ्याकडून ज्या काही अपेक्षा ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्याचा मी  नक्की प्रयत्न करेन असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्राची कला-संस्कृती जोपासण्याबरोबरच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातही शासन कटीबद्ध आहे. मराठीच्या अभिजाततेबाबत केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करू. तसेच, इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहेच. त्याची अंमलबजावणी देखील लवकरच केली जाईल. तसेच, महोत्सवामधून ज्या काही सूचना आम्हाला येतील त्या खुल्या मनाने स्वीकारू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

या प्रसंगी महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल, पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महापौर मुरलीधर मोहोळ, अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, दयानंद शेट्टी, अभिनेत्री मुक्ता बर्वे व अभिनेता सुबोध भावे उपस्थित होते.

Web Title: Amit Deshmukh says, 'This government will complete five years'