'वयाची अट न ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 23:24 IST2021-03-08T23:24:19+5:302021-03-08T23:24:28+5:30
कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धती मध्ये काही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

'वयाची अट न ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे'
पुणे: वयाची अट ना ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण सुरू करावे,अशी मागणी राज्याचे कोरोना साठीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांनी केली आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही असे सांगतानाच लोकांनी निर्बंध ना पाळल्यामुळे कोरोना पसरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याबरोबरच रात्रीचा लॉकडाऊनचा काहीही फायदा होत नसून निर्बंध हे मास्क घालणे,डिस्टंसिंग पाळणे या स्वरूपाचे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धती मध्ये काही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच शाळा आणि कॉलेज मुळे कोरोना वाढू शकत असून शाळा कॉलेज आणखी जास्त काळ बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. सरकार आता लॉकडाऊन करणार नाही पण लोकांनी नियम पाळले तरच परिस्थीती बदलेल, आता कोरोना सहित जगायची सवय करायला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील कोरोना ची पहिली केस सापडून ९ मार्च ला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे कोरोना विषयक आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांच्याशी लोकमत ने संवाद साधला. वाढत्या रुग्ण संख्ये विषयीची कारणं स्पष्ट करताना ते म्हणाले " दीड ते दोन महिन्यांपूर्वी लोकांनी कोरोना गेला अशी समजूत करून घेतली आणि तसं वागायला सुरुवात केली. अर्थात हे आर्थिक कारणांसाठी असले तरीही नियम पाळले गेले नाहीत. त्यात मग विदर्भात रुग्ण संख्येतील वाढ दिसायला लागली.आपल्या कडे ग्रामपंचायत निवडणुका झाल्या शाळा कॉलेज सुरू झाले.व्हायरस गेलेला नव्हता.
सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की हे म्युटेशन आहे का. पण तसे काही गंभीर म्युटेशन हे नसल्याचं स्पष्ट झालं. म्युटेशन हे होतंच. आत्ताचा जो स्ट्रेन आहे ते २८००० वं म्यूटेशन आहे. पण व्हायरस ची तीव्रता आणि प्रसार होण्याची क्षमता ही बदलली नाहीये हे लक्षात आलंय. अर्थात सध्या लोक घरात देखील विलगिकरण नीट करत नाहीयेत. त्यामुळे अख्खं कुटुंब पॉझिटिव्ह होतं आहे."
सध्याची परिस्थिती लक्षात घेता पुन्हा खासगी डॉक्टरांकडून लोकांना ट्रॅक करून त्यांचा चाचण्या वाढवणे गरजेचे आहे असंही साळुंके म्हणाले. सध्या राज्यात सुरु असलेल्या लोकडाऊन आणि निर्बंध बाबत विचारल्यावर ते म्हणाले ," पूर्ण लॉकडाउनला कोणाचीच आता सहमती असणार नाही.पण लोकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. शक्य असेल तर लग्न पुढे ढकला.बाहेर पडताना मास्क घाला.शाळा कॉलेज काही महिने तरी सुरू करायचा विचार करू नका. जिथे लोक एकत्र येतात त्याचा वर निर्बंध असले पाहिजेत. रात्रीचे कर्फ्यु लावल्याचा फार फायदा होणार नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले तसे कोविडचा एंडगेम नाही.तो पॅडमिक न राहता इंडेमिक म्हणून राहील. "
सध्या सुरू झालेलं लसीकरण हे आधार असलं तरी लसीकरण झालं म्हणजे निश्चिंत व्हाल असेही नाही तर त्यानंतर ही नियम पाळणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. याबरोबरच केंद्र सरकार ला लसीकरण करण्या बाबत आपण मागणी केली असल्याचे ही त्यांनी सांगितले. आपल्या देशात ३० कोटी लोकांचे लसीकरण करावेच लागेल तरच त्याचा फायदा होईल. लसीकरण आणि त्या बरोबरच कोरोना चे नियम पाळणे हे गरजेचं आहे. मी गेले ५ ते ६ दिवसांपासून केंद्रीय आरोग्य संचालक यांचा समोर आग्रह धरतो आहे की आता लसीकरण करण्यासाठी सगळ्यांनाच परवानगी द्यायला हवी. सगळे लोक बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता सगळ्यांनाच लसीकरणाची परवानगी देणे आवश्यक आहे. आपल्या कडे १८ चा खालचा लोकांना लसीकरणाची परवानगी नाही. पण त्या वरचा सगळ्या लोकांचं लसीकरण पुढचा महिनाभरात करणं गरजेचं आहे.