पुणे: भारतीय जनता पक्ष व शिवसेना (एकनाथ शिंदे) यांनी आपल्या मंत्र्यांना आपण मंत्री आहोत, आमदार आहोत, आमदार म्हणून बोलतो आहोत, याचे भान बाळगायला सांगावे, त्यांच्या बेताल वक्तव्याचा आमच्या पक्षाला त्रास होतो, अशी थेट टीका सरकारचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष ॲड. रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून रूपाली पाटील यांनी लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, असा निर्णय घेण्यापूर्वी, त्यासंबंधीचा सरकारी अध्यादेश काढण्यापूर्वी मंत्री भुसे यांनी किमान या विषयाशी संबंधित असलेल्यांबरोबर चर्चा करायला हवी होती. त्यांचे म्हणणे समजावून घ्यायला हवे होते. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात परप्रांतीय लोक येतात व त्यांची भाषा शिकणे भाग पाडतात. अशा वेळी आम्ही मराठी भाषिकांनी करायचे काय? त्यांची भाषा बोलायची का? हा एक भाग व दुसरा भाग इयत्ता पहिलीत असलेल्या मुलांवर तीन-तीन भाषांचा भार द्यायचा का? याला सर्व बालमानस अभ्यासकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तरीही सरकार आपला निर्णय वेगवेगळ्या पळवाटा काढून पुढे रेटत आहे. मराठीसाठी भांडणे हा ज्या पक्षांचा बेस आहे त्या शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांना त्यामुळे आयताच विषय मिळाला, असे मत रूपाली पाटील यांनी व्यक्त केले.
आमदार बबनराव लोणीकर यांनी ज्या पद्धतीने समोर उभ्या असलेल्या तरुणाचे खानदान काढले ते तर मंत्री किंवा आमदार कसा असू नये, याचे उत्तम उदाहरण आहे, अशा कडक शब्दांमध्ये रूपाली पाटील यांनी लोणीकर यांचा समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला प्रधानसेवक म्हणवतात. त्यांच्या या विनम्रतेचा एक साधा अंशही भाजपच्याच लोणीकर यांच्यात आलेला नाही, अशी टीका रूपाली पाटील यांनी केली.