Ajit Pawar Plane Crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात झाला. यामध्ये त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. त्या विमानातील 'ब्लॅक बॉक्स' जळाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आली होती. दरम्यान DGCA आणि AAIB ने हा ब्लॅक बॉक्स पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते किरण गुजर यांनी दिली.
बारामती येथील राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत किरण गुजर यांनी पक्षाची भूमिका मांडली. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव आणि तालुकाध्यक्ष संदीप बांदल उपस्थित होते. यावेळी गुजर म्हणाले, कालच डीजीसीए आणि एएआयबी यांनी ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे.
आमदार रोहित पवार आज याच मागणीसाठी बारामती तालुका पोलीस स्टेशनवर येणार आहेत. यावर भाष्य करताना गुजर म्हणाले की, "आमची आणि त्यांची मागणी एकच आहे . सखोल चौकशी. मात्र, तांत्रिक तपास पूर्ण होण्यासाठी वेळ लागतो, हे लक्षात घेतले पाहिजे. जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर गुन्हा दाखल झालाच पाहिजे."
जय पवारांचीही हीच मागणी
११ फेब्रुवारी रोजी जय पवार यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यापाठोपाठ आता तांत्रिक अहवाल येण्यास सुरुवात झाली असून, अजितदादांच्या अपघाताचे नेमके कारण लवकरच समोर येईल, अशी आशा बारामतीकरांना आहे, असेही गुजर म्हणाले.
"कोणत्याही मागणीच्या अहवालाला विलंब होतो हे आपल्या हातात नसून, यासाठी स्वतंत्र यंत्रणा असून तपास करताना तांत्रिक बाजू देखील तपासावी लागतात. 'ब्लॅक बॉक्स'बाबत बातम्या खऱ्या आहेत की खोट्या, हे आपल्याला माहिती नव्हते; परंतु कालच अहवाल आला आहे की ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. आलेला अहवाल ग्राह्य करायला हवा, असेही गुजर म्हणाले.