पुणे : यंदाच्या आषाढी वारीला येत्या बुधवारी १८ तारखेला सुरु होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून १८ तारखेला तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीतून १९ तारखेला प्रस्थान होणार आहे. त्यानिमित्त्ताने या पालखी सोहळ्याचा अजित पवारांनी आढावा घेतला. पालखी सोहळ्यात सर्व सुविधा उपलब्ध करून द्या अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अशातच पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक दिंडीला २० हजार देण्याची घोषणा केली आहे.
अजित पवार म्हणाले, मागील वर्षी सर्व दिंड्यांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी वीस हजार रुपये प्रमाणे रक्कम दिली होती. मानाच्या दहा पालख्यांशी संबंधित असणाऱ्या दिंड्या त्याची नोंदणी आमच्याकडे बाराशे दिंड्यांची झाली. आणि त्यांना आम्ही वीस हजार रुपयाप्रमाणे पैसे दिले. आता यावर्षी आषाढी एकादशी यात्रेत यंदा मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना २० हजार रुपये रुपये देण्यात येणार आहे. जीआर सोमवारी काढायच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यातून या मानाच्या ज्या पालख्या आहेत. त्याही नोंदणी केलेल्या दिंड्यांना प्रत्येकी वीस हजार रुपये देण्याच्या बद्दलचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्रिमंडळांनी घेतला आहे.
वारकरी संप्रदायाचा एक आगळा वेगळा मोठा सोहळा आहे. आणि तो अतिशय उत्साहात आनंदात अनेक वारकरी अनेक समाज त्याच्यामध्ये सहभागी होत असतो. अतिशय चांगल्या पद्धतीनं झाला पाहिजे. हीच राज्यसरकारची मुख्यमंत्र्यांची आमची सगळ्यांची भूमिका आहे. तसंच नगरविकास विभागाकडनं आम्ही पंढरपूरला अनुदान देतो. मागच्या वर्षीचा पंधरा कोटी रुपये दिलेले आहेत. यावर्षी साडे सतरा कोटी रुपये आहेत. त्याच्याबद्दलच्या पण सूचना दिलेल्या आहेत सोमवारी त्याबद्दलचे आदेश निघतील असेही अजित पवारानी यावेळी सांगितले आहे.