पुणे: बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने नऱ्हे परिसरातील जाधवर कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. आयुष जाधव (वय: १८, रा. वडगाव) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळच्या सत्रात इंग्रजी विषयाच्या पहिल्या पेपरला तणावामुळे आयुषने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारली. या घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बारावी परीक्षेच्या सकाळच्या सत्रातील इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला एका विद्यार्थ्याने परीक्षेचा तणाव घेत टोकाचे पाऊल उचलले आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने मंगळवारी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जात आहेत. दरम्यान, यंदा राज्यातील १०,५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून ३,३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात आली आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण दिसून आले. वेळेत पोहोचण्यासाठी पालकांची धडपड, शेवटच्या क्षणी अभ्यासाची घाई आणि परीक्षेच्या निकालाबाबतची धाकधूक अशा विविध भावना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होत्या.
12 th Exam : बारावीच्या परीक्षेचा ताण; विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:23 IST