पुणे : पुण्यात बुधवारी झालेल्या प्रचंड पावसामुळे आंबील ओढ्याला आलेल्या पुरात अरण्येश्वर येथील टांगेवाले कॉलनीमधील दहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच जणांचे मृतदेह हाती लागले असून अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफच्या तीन पथकांकडून सुरू होते. टांगेवाले कॉलनी ही टांगे चालवणाऱ्यांची कॉलनी आहे. ही कॉलनी नाल्याला खेटून आहे. बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्यावर नाल्याचे पाणी वाढले. रौद्र रुप धारण करुन वाहणारे पाणी कॉलनीतील घरांमध्ये घुसले. त्यामुळे घरांच्या भिंती खचल्याने येथील काही घरे पडली. यात दहा जणांचा मृत्यू झाला. तर काही जण प्रवाहासोबत वाहून गेल्याचे स्थानिकांनी सांगितले. आतापर्यंत पाच मृतदेह आढळले आहेत. यातील तीन मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून अन्य दोन मृतदेह काढण्याचे काम एनडीआरएफची तीन पथक करीत होते. येथील हजारे नामक महिला, त्यांची आठ आणि दहा वर्षांची दोन मुले, रवी आमले (वय 15), संतोष कदम (वय 45) अशी आतापर्यंत मृतदेह सापडलेल्यांची नावे आहेत. आणखी मृतदेहांचा शोध सुरू आहे.
पुण्यात मुसळधार पावसानं दहा जणांचा मृत्यू; घरांच्या भिंती खचल्यानं दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 03:50 IST