दिशा सालियनवर बलात्कार, सुशांत प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा पुत्र गजाआड जाईल; नारायण राणे भडकले
By हेमंत बावकर | Updated: October 26, 2020 17:22 IST2020-10-26T16:27:55+5:302020-10-26T17:22:30+5:30
Narayan Rane Angry on Udhhav Thackrey: उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बेडकाची उपमा राणे आणि त्यांच्या दोन मुलांना दिली होती. यावर नारायण राणे भडकले असून त्यांनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.

दिशा सालियनवर बलात्कार, सुशांत प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा पुत्र गजाआड जाईल; नारायण राणे भडकले
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे कसलेही ताळतंत्र नसलेले निर्बुद्ध आणि शिवराळ बडबड होती. सुशांत खून प्रकरणात आज ना उद्या आरोपी आत जातील. त्यापैकी एक मंत्री आत जाईल तो मुख्यमंत्री पूत्र आहे. दिशा सालियनवर बलात्कार कोणी केले आणि कोणी मारले, हे लवकरच बाहेर येईल, असा थेट आरोप नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केला.
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बेडकाची उपमा राणे आणि त्यांच्या दोन मुलांना दिली होती. यावर नारायण राणे भडकले असून त्यांनी भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा राणे कुटुंबियांवर आरोप कराल तर गेल्या 39 वर्षांत शिवसेनेत जे काही पाहिले ते सारे बाहेर काढेन अशी धमकी दिली. बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धवना मुख्यमंत्री केले नसते.
कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. ही मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी नाही का? पंतप्रधानांच्या कामाबद्दल बोलण्याची उद्धव ठाकरेंची लायकी नाही. त्यांनी महाराष्ट्र सांभाळावा. कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणावी, भाषणात कॉमा वापरत नाहीत, फुलस्टॉप वापरत नाहीत. दाणवेंचा बाप काढतात तो पण दिल्लीत. गोमुत्र, शेण रेशनवर सुरु केले का? अशी भाषा वापरू नये. तुम्ही ही भाषा सोडली नाही आणि आमचा जर तोल गेला तर महागात पडेल. साहेबांकडे पाहून आम्ही शांत आहोत, असा इशारा दिला.
तसेच युती केल्याने 56 आमदार निवडून आले ते नरेंद्र मोदींच्या नावावर आलेत. नाहीतर २५ आमदारही आले नसते. बेडूकतर पुढे जातो. गांडूळ दोन दिशांना जातो. तसे तुम्ही केले. सेक्युलर पक्षाशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्रिपद मिळवले. एकतरी काम हे मी केले असे दाखव. जीडीपी कळतो का? राज्याची अर्थव्यवस्था कळते का? अधिकारी हसतात य़ाच्यावर. बुद्धू आहे. बेळगावमध्ये जाऊन दाखवा, असे आव्हान राणे यांनी दिले. तसेच दसरा मेळाव्याचे भाषण हे विरोधकांना अपमानित करण्यासाठी द्वेषातून केलेले होते, असे राणे म्हणाले.
हिंमत असेल तर मराठा आरक्षण देऊन दाखवावे, आहे का कायद्याची घटनेची माहिती? मी दिले होते. संजय राऊत म्हणतात सरकार पाच वर्षे टिकणार, दिल्लीतील माणूस याला सांगून निर्णय घेतो. 25 वर्षे राज्य करणार म्हणे, असे कोणीही सांगू शकत नाही. शिवसेनेच्या आमदार खासदारांना कोणीही विचारत नाही. पुढच्या वेळेला 10 ते 15 पेक्षा जास्त आमदार येणार नाहीत, असेही राणे म्हणाले.