राजकारणाचं वारं बदललं; राहुल गांधी आणि संजय राऊतांच्या ११० मिनिटं बैठकीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 04:04 PM2021-08-12T16:04:32+5:302021-08-12T16:18:02+5:30

विरोधकांनी अभूतपूर्व अशी एकी दाखवल्याने गेल्या १९ जुलैपासून सुरू झालेले संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. या अधिवेशनात  राहुल गांधी यांचे नवे रूप  पाहायला मिळाले. गांधी घराण्याचा हा वारसदार गेली दोन दशके राजकारणात  आहे. राहुल  २००४ पासून लोकसभेत आहेत; परंतु त्यांच्याबाबतीत गोष्टी काही धड चालल्या नाहीत. ते मांडत  असलेले विचार आणि प्रत्यक्ष घडामोडी, कृती यांत खूपच तफावत राहिली. 

What happened in the 110 minute meeting between Congress Rahul Gandhi and Shivsena Sanjay Raut? | राजकारणाचं वारं बदललं; राहुल गांधी आणि संजय राऊतांच्या ११० मिनिटं बैठकीत काय घडलं?

राजकारणाचं वारं बदललं; राहुल गांधी आणि संजय राऊतांच्या ११० मिनिटं बैठकीत काय घडलं?

googlenewsNext
ठळक मुद्देजुलै २०२१ मध्ये नव्या राहुल गांधींचा उदय झाला आहे! त्यांनी राजकीय विश्लेषकांना धक्के द्यायला सुरुवात केली आहे!!राहुल सध्या नव्या भ्रमणकक्षेत फिरत आहेत. कोणाकोणाशी ते व्यक्तिगत बोलतात. हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ठरवल्याप्रमाणे सगळे पार पडले तर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना लवकरात लवकर कात टाकील.

हरीष गुप्ता

नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकारने संसदेत सादर केलेल्या विधेयकाचा मसुदा त्यांनी फाडला, त्यामुळे त्यांची प्रतिमा खालावली होती. परिणाम व्हायचा तोच झाला. २०१४ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला इतिहासातल्या सर्वांत कमी म्हणजे केवळ ४४ जागा मिळाल्या. भाजपचा चमकता प्रचारक नवज्योत सिद्धू याने त्या वेळच्या निवडणूक प्रचारात राहुल यांच्या नावाची खिल्ली उडवली ती देशभरात भलतीच उचलली गेली.  २०१९ साली तर राहुल यांनी त्यांची अमेठीची जागाही घालवली तो मोठाच वाईट धक्का होता. 

जुलै २०२१ मध्ये मात्र नव्या राहुल गांधींचा उदय पाहायला मिळत आहे. पावसाळी अधिवेशनात त्यांचे बदललेले रूप पाहून राजकीय विश्लेषक आश्चर्यचकित झाले. हा बदल इतका नकळत, सहजपणाने झाला की त्यांच्या अगदी जवळ असलेल्या लोकांच्याच तो लक्षात यावा! आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी संसद भवनावरून जंतरमंतरवर गेलेल्या विरोधकांच्या बसचे वाहक म्हणून राहुल यांनी भूमिका बजावली - ही बदलाची पहिली झलक होती. राहुल बसच्या दारात उभे राहिले आणि सगळे गाडीत बसल्यावर शेवटी आत आले. बस जंतरमंतरला पोहोचल्यावर प्रथम ते उतरले. सगळे उतरल्यावर, प्रत्येकाची सोय पाहिल्यावर मगच राहुल तेथून निघाले. संसदेत परत येताना याचीच पुनरावृत्ती केली गेली. त्याआधी त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना नाश्ता-बैठकीसाठी आमंत्रण दिले. हेही पहिल्यांदाच घडत होते. या वेळी स्वत:च बोलत बसण्यापेक्षा त्यांनी इतर नेते काय म्हणताहेत याकडे लक्ष दिले. पेगासस प्रकरणात विरोधकांनी संसदेत विरोध नोंदवला तेंव्हा राहुल त्यांच्याबरोबर होते. याआधी ते सतत मोबाइलवर बोलण्यात मश्गूल दिसत... आता ते दिवस गेले आहेत.

राहुल संजय राऊत यांना भेटले तेंव्हा...
राहुल सध्या नव्या भ्रमणकक्षेत फिरत आहेत. कोणाकोणाशी ते व्यक्तिगत बोलतात. संसदेच्या लॉबीत भेटतात, अनेकांच्या घरी जातात, अनेकांना आपल्या घरी बोलावतात. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना त्यांनी आपल्या १२ तुघलक रोड या निवासस्थानी बोलावले. ११० मिनिटे राहुल आणि राऊत यांच्यात चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारचा कारभार, शिवसेना; आणि पुढे काय? या सगळ्या गोष्टींचा या चर्चेत ऊहापोह झाला म्हणतात. विरोधी पक्षांच्या राजकारणाचे भवितव्यही दोन्ही नेत्यांच्या बोलण्यात येऊन गेले. त्यानंतरही राहुल आणि राऊत  दोनदा परस्परांना भेटले. संजय राऊत यांनाही हा अनुभव नवा होता. विरोधी नेत्यांनी राहुल यांच्यात आणखी एक बदल नोंदवला आहे. सध्या ते लक्ष देऊन ऐकतात आणि गटवार चर्चा करतात. “राहुल गांधी स्वत:तच गर्क असतात” असा त्यांच्याबाबतचा आजवरचा अनुभव होता, ते चित्र आता बदलते आहे.

प्रशांत किशोर विरुद्ध अँथनी 
काँग्रेस कार्यकारी समितीच्या सर्व सदस्यांनी  प्रशांत किशोर यांनी समोर ठेवलेल्या योजनेवर तपशिलात चर्चा केली. पीके हे निवडणूक डावपेचकार  म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कृती योजनेवर सोनियांना कार्यकारिणीतील प्रत्येकाचे मत हवे होते. के. सी. वेणुगोपाल यांनी प्रत्येक गटाकडे जाऊन त्यांचे म्हणणे नोंदवले आणि ते सोनियांपर्यंत पोहोचवले. संसदीय मंडळाप्रमाणे काँग्रेसकडे ‘निर्णय घेणारा एक छोटा कृतीगट’ असावा,  अशी सूचना पी. के. यांनी केली आहे. कार्यकारी समिती मोठी आहे, त्यामुळे निर्णयाला विलंब लागतो. ते त्वरेने घेतले जावेत ही त्यामागची अपेक्षा. प्रत्येक राज्याचा वेगळा विचार करता येईल अशी निवडणूक डावपेच आखणारी स्थायी व्यवस्था असावी ही पी. के. यांची दुसरी सूचना. २०२४ च्या लोकसभा निवडणुका समोर ठेवून ही सूचना त्यांनी केली आहे. १३६ वर्षांच्या काँग्रेस पक्षाने आपले निवडणूक धोरण आखण्यासाठी पीकेसारख्यांना पाचारण करावे, हे अँथनींसह काही ज्येष्ठ नेत्यांना खटकते आहे. एकाच माणसाला सुपरमॅन करणे अनेकांना चुकीचे वाटते. परंतु अँथनी एकटे पडले आहेत. त्यांचे गृहराज्य असलेल्या केरळात पक्षाची स्थिती चांगली नाही. प्रभाव दाखविल्याशिवाय पूर्व वैभवात डुंबत राहणे आता कोठल्याही पक्षाला परवडणारे नाही हेही तितकेच खरे. गंमत म्हणजे गुलाम नबी आझाद पीके यांच्या योजनेच्या बाजूचे आहेत.

कमलनाथ नवे कार्यकारी अध्यक्ष?
हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी ठरवल्याप्रमाणे सगळे पार पडले तर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक रचना लवकरात लवकर कात टाकील. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांची नियुक्ती होईल, अशी शक्यता आहे. ते पक्षात सर्वांत ज्येष्ठ आहेत आणि सोनिया गांधी यांनी जुन्या निष्ठावंत माणसाला पद द्यायचे ठरवले आहे. अहमद पटेल यांच्या अकाली निधनानंतर त्यांना मदतीसाठी कोणीतरी हवे आहे. पक्षाकडे प्रियांकासह ४ उपाध्यक्ष असले तरी नवा फेरबदल २०२४ च्या निवडणुका समोर ठेवून होत आहे.

Web Title: What happened in the 110 minute meeting between Congress Rahul Gandhi and Shivsena Sanjay Raut?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.